इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापुरातील खडी क्रशरच्या मुद्द्यावरून माढा तालुक्यातील जनशक्ती शेतकरी संघटनेचे नेते अतुल खूपसे यांनी थेट आमदार दत्तात्रय भरणे यांना लक्ष्य केले आणि त्यानंतर खवळून उठलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी इंदापुरात खूपसे यांना येऊन दाखवण्याचं आव्हान दिलं. काल ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादीने मोर्चा काढला. तहसीलदार कचेरीपुढे ठिय्या मांडला. झेंडा नव्हे दांडा आणल्याचे सांगत खूपसे यांना सांगितल्याप्रमाणे सटकवण्याचे धोरणही आखले. दुसरीकडे खूपसे यांनी राष्ट्रवादीचा मोर्चा सुरू असतानाच मी येतोच असे सांगून प्रतिआव्हान देणारा व्हिडिओ जारी केला आणि त्यानंतर इंदापुरातील हा हाय व्होल्टेज ड्रामा संध्याकाळपर्यंत सुरू राहिला.
इंदापुरातील खडी क्रशर चा अतुल खूपसेंना पुरका कसा आला असा प्रश्न खरे तर पहिल्यांदा पडला, त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीला अतुल खूपसे सारख्या छोट्याशा जनशक्ती पक्षाविरुद्ध आपली मोठी ताकद खर्ची पाडायला भाग कोणी पाडलं हा दुसरा प्रश्न पडला. अतुल खूपसेंनी नेमके असे काय केले की राष्ट्रवादी खवळून उठली?
यात प्रश्नही अनेक आहेत आणि उत्तरही अनेक! हे तेच अतुल खूपसे पाटील आहेत, ज्यांनी इंदापूर तालुक्यातील 22 गावांना उजनी कडून मिळणारे पाणी मिळू नये यासाठी आंदोलने केली आणि सोलापूरचे पालकमंत्री असताना दत्तात्रय भरणे यांना मोठ्या प्रमाणात नाराजी कशी उत्पन्न होईल यासाठी मोट बांधली. अतुल खूपसे यांचे हे आंदोलन भाजपच्या काही लोकांच्या कृपया ताकदीवर सुरू होते असा आरोपही त्यादरम्यान केला गेला होता.
तेव्हापासूनच इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी अतुल खूपसे वर चिडून आहे. त्यातच अतुल खूपसे यांनी खडी क्रशरच्या मुद्द्यावरून थेट दत्तात्रय भरणे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. सव्वा दोन कोटींची गाडी भेट दिल्यामुळेच परप्रांतीय खडी क्रशर ठेकेदारावर भरणे मेहरबान आहेत असा कथित आरोप करून त्यांनी एकच धांदल उडवून दिली.
मात्र पोकळ आरोप करून राष्ट्रवादीची बदनामी करत असल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते खवळून उठले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी तर थेट राजकारणाच्या पलीकडे जात खूपसे याला सटकवू असाच इशारा दिला आणि एवढ्यावर न थांबता थेट मोर्चाचे आयोजन केले. त्यावर खूपसे यांचे म्हणणे असे होते की, मी पंधरा दिवसापूर्वी अगोदरच आमच्या नियोजित आंदोलनाची नोटीस पोलीस आणि महसूल प्रशासना दिली होती. मग त्यावर प्रतिआंदोलने काढून राष्ट्रवादी सत्तेचा गैरवापर करत असल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोप नव्याने मांडला.
मात्र इंदापुरातील परिस्थिती नेमकी कशी आहे याची माहिती पोलिसांना असल्याने पोलिसांनी खूपसे यांनी इंदापुरातील आंदोलनासाठी येऊ नये व विनाकारण येथील वातावरण बिघडवू नये यासाठी पोलिसांनी कंबर कसली आणि प्रसंगी पुणे जिल्ह्याच्या हद्दीपलीकडे जाऊन सोलापूर जिल्ह्यातच अतुल खूपसे यांना अडवले.
त्यावर अतुल खूपसे यांनी एक तर आम्ही इंदापूरत जाऊ, नाहीतर तहसीलदारांना येथे यावे लागेल असे आव्हान देताच पोलीस यंत्रणेने त्या संदर्भात नियोजन केले आणि तहसीलदार श्रीकांत पाटील हे निवेदन स्वीकारण्यासाठी परजिल्ह्यात पोहोचले. आता राष्ट्रवादी असे म्हणेल की, आम्ही मोर्चा झाल्यानंतरही दुपारपर्यंत त्याची वाट बघत थांबलो. अतुल खूपसे कुठे आला? तर दुसरीकडे अतुल खूपसे आणि त्याचे कार्यकर्ते म्हणतील की, आम्ही तयारी केलीच होती. तयारीनुसारच आम्ही आलो होतो, पण पोलिसांनी आम्हाला अडवले आणि आमची ताकद एवढी मोठी की, इंदापूरच्या तहसीलदारांना आमचे निवेदन स्वीकारण्यासाठी चक्क सोलापूर जिल्ह्यात यावे लागले.
या साऱ्या प्रकरणात जिंकले कोण, हरले कोण याची कारणमीमांसा होत राहील, पण राष्ट्रवादीने अतुल खूपसे यांना एवढे महत्व का दिले? हा प्रश्न मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे. अतुल खूपसे व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी इंदापूर तालुक्यात हा हाय व्होल्टेज ड्रामा घडवून तर आणला, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं इंदापूरच्या लोकप्रतिनिधींवर अनेक प्रश्न उपस्थित केले, यामागे नेमकं कोण होतं, हे शोधलं तरच कोण जिंकलं कोण हरलं याचे उत्तर मिळेल.











