राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : माझा स्वतंत्र पक्ष असून मी कोणत्याही पक्षाची मदत न घेता, युती न करता देशातील आगामी सर्व लोकसभा आणि महाराष्ट्रातील सर्व विधानसभेच्या जागा पूर्ण ताकतीने लढवणार आणि ती जिंकून आणणार ! असे सांगून राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी एकला चलो ची हाक दिली आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे वतीने पंढरपूरवरुन जन स्वराज यात्रेला सुरुवात करण्यात आली. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर हे या यात्रेत सहभागी आहेत. दिड महिन्यापुर्वी सुरू झालेली ही जनस्वराज यात्रा बारामती लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि .२८)पोहोचली. इंदापूर व दौंड तालुक्यात ठीक ठिकाणी कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी या जन स्वराज यात्रेचे स्वागत केले.
दौंड येथे पत्रकाराशी बोलताना महादेव जानकर म्हणाले की, सध्या जनतेचे राज्य नसून जनतेचे राज्य आणण्यासाठी ही स्वराज्य यात्रा सुरू केली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महिलांच्या समस्या काय आहे हे जाणून घेत आहे. सध्या दुष्काळाची अवस्था निर्माण झाली आहे.ती सोडवण्यासाठी आणि रयतेचे राज्य यावं यासाठी ही यात्रा काढली आहे.
देशातील आगामी लोकसभेच्या ५४३ जागा लढवणार आहे. बारामती,माढा, परभणी यासह लोकसभा मतदारसंघाची तयारी चालू आहे. बारामती लोकसभा लढवण्याची माझी इच्छा आहे पण पक्षाने मला या जागेवर उमेवारी दिली, तर उभा राहील अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. दरम्यान अगोदर लोकसभेचे रणांगण करणार, लोकसभेला दिल्लीला जाणार आणि विधानसभा लढविणार. दौंडचे स्थान हे माझ्या हृदयाप्रमाणे. येथील जनतेने मला मोठी मदत केली आहे. ती मला आईप्रमाणे आहे. त्यामुळे दौंडच्या तमाम जनतेचा ऋणी आहे. दौंड विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार उभा करणार आणि जिंकणारही, असा विश्वास महादेव जानकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.











