सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : खडकवासला प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात पाऊस नाही मात्र पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस आहे, त्यामुळे प्रकल्पाच्या पाण्यासाठी वाढ होत आहे त्यामुळे इंदापूर तालुक्याच्या शेती सिंचनासाठी खडकवासला कालव्यातून लवकरच आवर्तन सोडण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली .
सध्या या भागात पाऊस नाही. सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने या पाणी साठ्यात प्रतिदिवसाला वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या आपल्या शेतातील पिके वाचवण्यासाठी खऱ्या अर्थाने खडकवासला कालव्याला आवर्तनाची गरज होती. सध्या खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली आहे.
सद्यस्थितीला खडकवासला धरण साखळीत आज अखेर जवळपास 50 टक्के पाणी साठा जमा झाला आहे. तसेच धरण क्षेत्रात . संततधार पाऊस सुरू आहे. यापुढील काळातही प्रतिदिवशी या पाणी साठ्यात वाढ होणार आहे. तालुक्यात पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिके जवळपास जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. उसाच्या लागणी देखील झालेले नाहीत. तसेच विहिरी व कुपनलिका यांचेही जलस्त्रोत कमी पडल्याने सध्या शेतात ऊसासारख्या पिकांनाही पाणी देणे मुश्किल झाले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी सध्या नवा मुठा उजवा खडकवासला कालव्याला तत्काळ पाणी सोडणे गरजेचे आहे याविषयीची मागणी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता श्री गुणाले यांच्याकडे केल्याचे सांगत इंदापूर तालुक्याच्या शेती सिंचनासाठी आवर्तन सोडण्याच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. या आवर्तनाचा इंदापूर तालुक्यातील पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.