सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
केंद्र सरकारचे जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी इंदापूर दौरा तर केला, पण काल जेव्हा हर्षवर्धन पाटील यांनी जलजीवन मिशनची कामे घेतलेल्या ठेकेदारांवर टीका केली, तेव्हा प्रल्हाद सिंह पटेल यांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र आज खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रल्हादसिंह पटेल यांच्यासह केंद्र सरकारला देखील शासकीय प्रोटोकॉलची जाणीव करून देत सरकारी कार्यक्रम पक्षीय करण्याच्या मानसिक प्रवृत्तीचा निषेध केला.
आज खासदार सुळे यांनी ट्विट करत हा निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी नमूद केल्याप्रमाणे, बारामती लोकसभा मतदारसंघात केंद्रीय जलशक्ती व अन्नप्रक्रिया राज्यमंत्री प्रल्हादजी पटेल यांचे आगमन झाले. आपल्या मतदारसंघात केंद्रातील मंत्री येतात ही अतिशय आनंदाची बाब आहे. अतिथी देवो भव ! या तत्वानुसार या मतदारसंघाची खासदार या नात्याने त्यांचे मी जनतेच्या वतीने हार्दिक स्वागत करते.
मा. प्रल्हादजी काल इंदापूर येथे केंद्र सरकारच्या ‘जल जीवन मिशन’ या शासकीय कार्यक्रमाच्या भूमीपुजन आणि उद्घाटनासाठी आले होते. शासकीय कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री आल्यास तेथे स्थानिक लोकप्रतिनिधींना आमंत्रण देणे हा प्रोटोकॉल आहे. कारण शासकीय कार्यक्रम हा जनतेचा असतो, कुण्या एका पक्षाचा असत नाही. परंतु तसे झाले नाही.
महत्वाची नमूद करण्याची बाब अशी की, ‘जल जीवन मिशन’च्या अंतर्गत आपल्या मतदारसंघात कामे व्हावी यासाठी माझ्यासह इंदापूरचे आमदार व माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आवश्यक त्या पातळ्यांवर उचित पाठपुरावा केला होता. यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत निधी प्राप्त झाला, ही वस्तुस्थिती आहे.
शासकीय कार्यक्रमात राजकीय हेवेदावे, पक्षीय मतभेद, मनभेद आदी दूर ठेवायचे असतात. परंतु या संकेताला पुर्णतः हरताळ फासून व स्थानिक लोकप्रतिनिधिंना डावलून हा कार्यक्रम फक्त भाजपाचा राजकीय कार्यक्रम असावा यापद्धतीने पार पाडण्यात आला. हे अतिशय संकुचित मनोवृत्तीचे लक्षण आहे. या मनोवृत्तीचा निषेध! अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी या कार्यक्रमाचा निषेध केला आहे.
दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी ठेकेदारांवर आणि अधिकाऱ्यांवर केलेला शाब्दिक वैयक्तिक हल्ला आणि दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी केलेला निषेध या पार्श्वभूमीवर इंदापूरच्या वाड्यावस्त्यांवर पोहोचणारे पाणी प्रत्यक्षात राजकीय भांडणाचे निमित्त ठरणार यात आता शंकाच उरली नाही. आता ही कामे वेळेत होणार का की ठेकेदार आणि स्थानिक राजकारणी यांच्या वादात ही कामे रखडणार याची देखील भीती या निमित्ताने निर्माण झाली आहे.