बारामती : महान्यूज लाईव्ह
निवडणुकीच्या पूर्वी व निवडणुकीनंतर देखील ज्या महाविकास आघाडीशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुत जुळलेले आहे, त्याच महाविकास आघाडीच्या राज्यातील सत्तेच्या काळात माजी खासदार राजू शेट्टींनी पुन्हा एकदा बारामती लक्ष्य केली आहे, अर्थात यावेळी बारामती लक्ष्य करण्याचे कारण उसाचा दर नाही, तर दुधाचा दर आहे आणि दुधाचा पट्टा देखील आता बारामती इंदापूर आणि पुणे जिल्हा आहे.. त्यामुळे योग्य वेळी, योग्य ठिकाणी राजू शेट्टींनी हात घातला असून येत्या 27 ऑगस्ट रोजी बारामतीच्या प्रांत कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा नेला जाणार आहे.. अर्थात हे आंदोलन बेदखल कराल, तर ‘सरकार’ तुमच्या पाठीत हेच म्हशीचे लोढणे घालू असा घणाघाती इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिला आहे. त्यामुळे बारामतीच्या राजकीय पंढरीतील वातावरण आंदोलनापूर्वीच तापले आहे.
राज्यातील दूध उत्पादकांची केंद्र सरकार व राज्य सरकार कडून अक्षरशः पिळवणूक सुरू असून 17 व 18 रुपये प्रति लिटर दर दुधाला मिळत आहे. उत्पादन खर्चाच्या निम्मा दर दूध उत्पादकांच्या हातात पडत असून त्यातून दूध उत्पादकांची फसवणूक होत आहे, मात्र दूध संघ मालक गब्बर होत आहेत. अशा परिस्थितीत दुधाची भुकटीची आयात केन्द्र सरकारने रद्द केली पाहिजे व राज्य सरकारने दुधाचा दर वाढवून दिला पाहिजे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले आहे.
मध्यंतरी भाजपने देखील हे आंदोलन चालवण्याचा प्रयत्न केला, परंतु शेतकऱ्यांमधून त्याला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. आता राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा उसानंतर बारामती लक्ष्य केली आहे. उसाच्या दराच्या आंदोलनातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजकीय वर्चस्व राज्यात निर्माण झाले होते, त्यामुळे कोणतेही आंदोलन यशस्वी करायचे असेल तर, जेव्हा बारामतीकरांचे राज्य असते, तेव्हा बारामतीतच आंदोलन केले पाहिजे हे चाणाक्ष राजू शेट्टी यांनी ओळखले आहे.
जरी राजू शेट्टी यांचे महाविकास आघाडीशी सूत जुळले असले तरीदेखील आपल्या संघटनेचे राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी व टिकून ठेवण्यासाठी राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा बारामती गाठण्याचे ठरवले आहे आणि त्यासाठी दिवस निवडला आहे तो 27 ऑगस्ट रोजीचा..! महाराष्ट्रात खपल्या जाणाऱ्या व महाराष्ट्रात उत्पादन होणाऱ्या दुधाच्या जवळपास निम्मे दूध हे इंदापूर व बारामती तालुक्यात संकलित केले जाते आणि म्हणूनच हाच मुद्दा लक्षात घेत राजू शेट्टी यांनी बरोबर ठिकाणी घाव घालण्याचे ठरवले आहे.
यानिमित्ताने राजू शेट्टी यांनी दूध उत्पादकांना आवाहन केले आहे की, मी 27 ऑगस्ट रोजी बारामती येथे येणार आहे तुम्ही येणार का?
राजू शेट्टी यांनी केलेले आवाहन येथे पहा अथवा महान्यूज फेसबुक पेज वर पाहू शकता










