लक्ष्यवेध : घनशाम केळकर, बारामती.
`सारे जहाँ से अच्छा ` हे सर्वपरिचित गाणे आहे. `तराना–ए–हिंद` या नावाने प्रसिद्ध असलेल्या या गीतातील नेहमी कोट केल जाणारे कडवे म्हणजे
मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना
हिंदी हैं हम, वतन है हिन्दोसिताँ हमारा.
पण नियतीचा खेळ बघा, `मजहब नही सिखाता` लिहीणारा हा कवी अखेर मज्हबच्याच रस्त्याने गेला. त्या कवीचे नाव अल्लामा इक्बाल… इक्बाल आज पाकिस्तानचा राष्ट्रकवी आणि पाकिस्तानचे स्वप्न पाहिलेला पहिला माणूस म्हणून ओळखला जातो. पाकिस्तानातील कोणत्याही छोट्या मोठ्या जाहिर कार्यक्रमात पैगंबरांनंतर ज्या दोन माणसांची नावे हमखास घेतली जातात, त्यापैकी एक इक्बाल आणि दुसरे कायदेआझम जीना.
मात्र ज्यावेळी इक्बालने `तराना–ए–हिंद` लिहलं, त्यावेळी पाकिस्तानचं स्वप्न हवेतही नव्हतं. त्यामुळे या गाण्यातील हिन्दोसिताँ म्हणजे बांग्लादेश आणि पाकिस्तानसह अखंड हिंदुस्थान आहे. हे गीत वाचल्यावर हे लिहिणाऱ्याला कधी पाकिस्तानचं स्वप्न पडू शकतं यावर विश्वास बसणंच कठीण आहे. आज भारतीय मुस्लिमांना तुम्ही इथलेच भूमिपूत्र आहात हे मानण्याचा उपदेश केला जातो. मात्र तराना–ए–हिंद मध्ये इक्बाल या भूमीच्या प्राचीनत्वाची साक्ष देण्यासाठी साक्षात गंगेलाच आवाहन करत म्हणतो,
ऐ आब–ए–रूद–ए–गंगा! वह दिन हैं याद तुझको?
उतरा तिरे किनारे जब कारवाँ हमारा
हे गंगे, तुला तरी आठवतय का, आम्ही तुझ्या किनाऱ्यावर केव्हा आलो ते?
या पूरातन संस्कृतीचा अभिमान त्याच्या या शब्दा शब्दातून डोकावतो जेव्हा तो जगाला सांगतो,
यूनान–ओ–मिस्र–ओ–रूमा सब मिट गए जहाँ से
अब तक मगर है बाक़ी नाम–ओ–निशाँ हमारा
इजिप्त, रोम आणि ग्रीकांच्या जुन्या संस्कृती लयाला गेल्या पण त्याहून प्राचीन असलेली आमची हिदुस्थानी संस्कृती आजही नावलौकिक टिकवून आहे. ही संस्कृती का टिकली असावी हे सांगताना तो म्हणतो
कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी
सदियों रहा है दुश्मन दौर–ए–ज़माँ हमारा
अशी काहीतरी गोष्ट आमच्याकडे आहे की, साऱ्या जगाने हल्ले करूनही आम्ही टिकून आहोत आणि शेवटच्या कडव्यात पारतंत्र्यात पडलेल्या या मातृभुमीचे दु:ख त्याच्या लेखणीतून उतरते.
इक़्बाल! कोई महरम अपना नहीं जहाँ में
मालूम क्या किसी को दर्द–ए–निहाँ हमारा !
अरे इक्बाल, जगात अस कुठलेही मलम नाही जे माझ्या या दु:खाला उतार पाडू शकेल. कधीकाळी अखंड हिंदुस्थान पुन्हा अस्तित्वात आला तर त्याचे वर्णन करणारी जी काही दोन चार गीत असतील त्यामध्ये हे गीत अग्रभागी असेल यात शका नाही. पण यानंतर इक्बालच्या आयुष्याने वेगळे वळण घेतले. मुस्लिमांना वेगळे राष्ट्र मिळाल्याशिवाय त्यांचे धार्मिक हक्क अबाधित राहणार नाहीत या विचाराने तो प्रभावित झाला. मग त्याने तराना–ए–हिंद च्या धर्तीवर मुस्लिमांचे विजयी गीत तराना–ए–मिल्ली लिहले. त्यांची अल्लाकडे कैफियत मांडणारे शिकवा लिहले. त्याला उत्तर देणारे जवाब–ए–शिकवा लिहले.
अस म्हणतात, रवींद्रनाथ टागोरांना नोबेल मिळाले त्यावेळी इक्बाल फारच नाराज झाला. टागोरांपेक्षा जास्त पात्रता असूनही माझ्यावर अन्याय केला गेला असे तो म्हणू लागला. त्याची समजून काढण्यासाठी टागोर त्याच्या लाहोरच्या घरी गेले असता त्याने त्यांच्यासाठी दारही उघडले नाही.
त्यानंतरचे १९३० सालच्या डिसेंबरमधील त्याचे अलाहाबादेतील प्रसिद्ध भाषण, ज्यात त्याने मुस्लिमांसाठी वेगळ्या राज्याची कल्पना मांडली. त्याने पाकिस्तान हे नाव घेतले नव्हते. त्याला वेगळे राष्ट्र म्हणायचे होते कि हिंदुस्थानातच स्वायत्त राज्य म्हणायचे होते याबाबतचा वाद अजूनही संपलेला नाही. पण पाकिस्तानचा भाष्यकार हे लेबल त्याच्यामागे तेव्हापासून कायमचे लागले.
प्रत्यक्ष पाकिस्तान जन्माला आला, त्यावेळी अल्लामा इक्बाल हे जग सोडून गेला होता. पाकिस्तानने त्याला राष्टकवीचा बहूमान दिला असला तरी त्याचे ` साहे जहॉंसे अच्छा ` मात्र साऱ्या जगाने कायमचे विसरून जावे असे पाकिस्तानमधील कट्टरतावाद्यांना वाटते. अल्लामा इक्बाल हे नावच इतिहासातून कायमचे डिलिट करून टाकावे असे भारतातील कट्टरतावाद्यांना वाटते. मात्र आजही १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला लाऊडस्पिकरवरून किंवा रेडिओवरून इक्बालचे ते शब्द आपल्या कानाभोवती रुंजी घालतातच. “ सारे जहॉंसे अच्छा, हिंन्दोसिता हमारा “
लेखकाला इथे संपर्क साधू शकता- Ghansham Kelkar email- ghansham.kelkar@gmail.com











