सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
सपकळवाडी सोसायटीत पराभव झाला असला; तरी तो 1950 पासून पवार विरोधक असलेल्या लोकांच्या ताब्यातील संस्थेच्या सत्तेला पहिल्यांदाच राष्ट्रवादीने सुरुंग लावला आणि दोन उमेदवारांच्या रूपाने भाजपच्या ताब्यातील या संस्थेमध्ये प्रवेश केला आणि सचिन सपकळ यांनी कारखान्याच्या दोन माजी संचालकांना यानिमित्ताने गुडघ्यावर आणले अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते तुषार सपकळ यांनी या पराभवानंतर व्यक्त केली आहे.
सपकळवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत भाजपच्या पॅनेलचा विजय झाल्यानंतर तुषार सपकळ यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, ही संस्था कधीही आमच्या ताब्यात नव्हती. याउलट आम्हीच या संस्थेत आता प्रवेश केला. 1975 पासून या संस्थेवर पवार विरोधकांच्या विचारांची सत्ता आहे. या संस्थेमधील सभासद हे श्रीगोंदा तसेच बाहेरगावचे आहेत.
या बाहेरच्या सभासदांच्या जीवावर आत्तापर्यंत या सोसायटीची सत्ता विरोधक राखत होते. गेल्या वेळच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने यामध्ये भाग घेतला आणि या वेळी तर दोन उमेदवार निवडूनही आणले. आमच्या उमेदवारांचा पराभव देखील अगदी दोन ते चार मतांनी झालेला आहे. आमचा पराभव आम्हाला मान्य आहे, पण खरी गोष्ट ही आहे की, या अनभिषिक्त सत्तेला राष्ट्रवादीने सुरुंग लावला आहे आणि हेच सर्वात महत्वाचे आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, मातब्बर पदाधिकाऱ्यांना या निवडणुकीत अगदी जेरीस आणण्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी, मतदार आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ यशस्वी ठरले आहेत, असाच या निवडणुकीचा आमच्या दृष्टीने अर्थ आहे. असे तुषार सपकाळ यांनी सांगितले.