राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
बारामती लोकसभा मतदारसंघात मंगळवारी सकाळी सात पासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत तालुक्यात ४७ टक्के मतदान झाले, तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत ५९.३० टक्के मतदान झाले. काही मतदान केंद्रावर सायंकाळी उशिरापर्यंत मतदान चालू असल्याचे चित्र पहायला मिळाले.
दरम्यान, अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान केंद्रावर उन्हाची तीव्रतेचा परिणाम जाणवला अनेक मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसून आला. दौंड विधानसभा मतदारसंघात अनेक मतदान केंद्रावर सकाळ पासून मतदारमध्ये निरुत्साह पाहायला मिळाला. मोठ्या मतदार संख्या असलेल्या मतदान केंद्रावर ही तुरळक गर्दी पाहायला मिळाली.
उन्हामुळे अनेक मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडणे टाळले. त्यामुळे दुपारी एक वाजेपर्यंत तालुक्यात २० टक्के मतदान झाले. तर दुपारी तीन वाजेपर्यंत ३७ टक्के मतदान झाले. सायंकाळी चार वाजता अनेक मतदार मतदानासाठी बाहेर पडल्याने मतदान केंद्रावर गर्दी पाहायला मिळाली. दौंड शहरासह तालुक्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५९.३० टक्के मतदान झाले.
अर्थात ९४ वर्षाच्या वृध्दांनी देखील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. महिला मतदारही मोठ्या संख्येने रांगेत उभे राहून मतदान केल्याचे चित्र होते. कुसेगाव येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काही वेळ गोंधळ उडाला मात्र प्रशासनाने तत्काळ दुसरे ईव्हीएम मशिन उपलब्ध केल्याने मतदान प्रक्रिया पुन्हा चालू झाली.
अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याने त्यांना मतदानापासुन वंचित रहावे लागल्याने नाराजी व्यक्त केली. काही मतदान केंद्रावर अपंग व वृद्ध मतदारांची गैरसोय झाल्याचे चित्र होते, तर यवत येथील मतदान केंद्रावर तृतीयपंथी मतदारांनी मतदान करुन लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेतला. दौंड विधानसभा मतदारसंघातील ३०९ मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
३ लाख ४ हजार ६०७ एकुण मतदारापैकी १ लाख ८० हजार मतदांरानी मतदाराचा हक्क बजावला .दौंड विधानसभा मतदारसंघात महा विकास आघाडी आणि महायुती मध्ये काटेची टक्कर मतदान प्रक्रियेतुन झाल्याचे चित्र मिळाले. दरम्यान, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार अरुण शेलार यांनी योग्य नियोजन केल्याने ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
दरम्यान, दौंड मध्ये आमदार राहुल कुल – माजी आमदार रमेश थोरात आणि भाजप चे पुणे जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे हे तीन मातब्बर नेते आणि एकेकाळी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाणारे हे या निवडणुकीत एकत्र येऊन प्रचार करताना आणि एकाच व्यासपीठावर दिसले.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजप सोबत महायुतीत सहभागी झाल्याने हे चित्र दौंड तालुक्यात पहायला मिळाले. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यात ही सरळ लढत मानली जात असली तरी सुनेत्रा पवार या दौंड मधुन चांगल्या मतांनी आघाडी घेतील असा अंदाज व्यक्त केला जात होता, मात्र दौंड मध्ये मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ही निवडणूक नेते एकीकडे आणि शेतकरी आणि जनता एकीकडे असल्याचे चित्र दिसून आले.
त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या तुतारीची हवा तालुक्यात मतदान केंद्रावर ऐकायला मिळाली. अनेक भागात पैसाचे वाटप करण्यात आल्याची ही चर्चा होती, मात्र पैसे वाटपावरून या नेत्यांमध्ये मतभेद झाल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाल्याचीही चर्चा शहरासह तालुक्यात सुरू होती. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यामागील तीन लोकसभा निवडणुकीतील मतांची पिछाडी भरून काढतील असा अंदाज असून त्या अंदाजे दहा ते पंधरा हजार मतांची आघाडी दौंड मधुन घेतील असा राजकीय विश्लेषक अंदाज व्यक्त करीत आहेत.
तसं झाल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का देणारा हा निकाल ठरेल आणि आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांना आत्मचिंतन करायला लावणारा हा निकाल ठरेल ? अर्थात हे फक्त अंदाज आणि तर्कवितर्क केले जात आहेत. प्रत्यक्षात ४ जुनला होणाऱ्या निकालाचीच वाट पहावी लागणार हे निश्चित.











