वालचंदनगर : अक्कलकोटहून निघालेला श्री स्वामी समर्थ पादुका पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याचा मुक्काम संपवून वालचंदनगर येथे मुक्कामी पोचला, येथे भाविकांनी स्वामींच्या पालखीचे उत्स्फूर्त स्वागत केले. पालखीच्या आगमनाच्या निमित्ताने घरांसमोर रांगोळी व आरती ओवाळणी भाविकांनी केली. यानंतर भवानीनगर येथेही पालखी सोहळ्याचे स्वागत झाले.
स्वामी समर्थांच्या जयघोषात वालचंदनगरीत पालखी सोहळ्याचे आगमन झाले. भाविकांनी स्वामींच्या पालखीचे घरासमोर रांगोळी काढून व पालखीचे ओवाळणी करून स्वागत केले. वालचंदनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने मेन कॉलनी, नवीन बाजारपेठ या ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक येथे ढोल ताशांच्या गजरात पालखीची मिरवणूक काढण्यात आली. येथील ललिताबाई मंगल कार्यालयात पालखीचा मुक्काम होता. यंदाचे पालखी सोहळ्याचे २१ वे वर्षे होते. राज्यातील गावोगावी स्वामी समर्थांच्या भक्ताना पादुकांचे दर्शन घेता यावे यासाठी अक्कलकोट संस्थानने ही परिक्रमा सुरू केली आहे.
वालचंदनगर येथील हनुमान मंदिरात सुहास पटवर्धन व सचिन उरणकर यांनी पादुकांची आरती केली. येथील स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांचा रमेश देशपांडे यांनी सत्कार केला. यावेळी अक्कलकोटचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई, इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, वालचंदनगरच्या प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या शाखा संचालिका सुवर्णा दिदी, महाबळेश्वरच्या सनराईज कॅन्डल्सचे प्रमुख व उद्यमशील वक्ते भावेश भाटिया, निवृत्त फौजदार मोहन यादव यांचाही सन्मान करण्यात आला.
पालखी सोहळ्याच्या मुक्कामाच्या निमित्ताने तृप्ती देसाई, भावेश भाटिया, मोहन यादव यांनी उपस्थितांना सामाजिक प्रबोधन केले. रात्री महाआरतीवेळी पोलिस मित्र परिवार संघाच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षा शुभांगी चौधर, मंडळाचे जेष्ठ सल्लागार व ज्येष्ठ पत्रकार अतुल तेरखेडकर, डॉ विकास शहा, राम कुंभार, राजू भाटिया, जितू दुरुतकर, श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे उपाध्यक्ष वैभव कदम, सचिव अमोल राजपूत, खजिनदार निलेश चव्हाण, संचालक अमरसिंह निंबाळकर, विजय कांबळे, राहूल गोडसे, शितल पवार, उमेश सगरे, शंकर काटे, हणमंत कुंभार, खंडू कुंभार आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन कुलकर्णी यांनी केले.










