सणसर ग्रामपंचायतीत महाविकासआघाडीचा प्रयोग
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
स्थानिक पातळीवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये एखाद्या प्रस्थापित गटाविरोधात लढताना विरोधकांमधील अनेक पक्षातील लोक एकत्र येतात, मात्र जेव्हा सत्ता हातात येते, तेव्हा मात्र अचानक स्वपक्षीय प्रेम उफाळून येते आणि त्या सत्ताधाऱ्यांमध्येही राजकीय गट पडतात अशी अनेक उदाहरणे आहेत. मात्र राजकारणाचे जोडे नेहमीच बाहेर ठेवून गाव चालविणाऱ्या सणसरमध्ये असे कधीच घडत नाही. आताही राष्ट्रवादीच्या बहुमताच्या ग्रामपंचायतीत शिवसेनेचा कार्यकर्ता उपसरपंच झाला आहे. शिवसेनेचा निष्ठावान युवा कार्यकर्ता अक्षय काटकर आज सणसरचा उपसरपंच झाला.
पाच वर्षापूर्वी झालेल्या निवडणूकीत इंदापूर तालुक्यातील सर्वात कमी वयाचा ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्याची ओळख निर्माण झाली होती. सणसरचे मावळते उपसरपंच यजुवेंद्रसिंह निंबाळकर यांनी अक्षय साठी पदाचा राजीनामा दिला. या रिक्त जागेवर आज अक्षय काटकर याची निवड झाली. यावेळी सरपंच ललिता गायकवाड, मावळते उपसरपंच यजुवेंद्रसिंह निंबाळकर यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
इंदापूर तालुक्यातील सणसर हे गाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे, मात्र कायदा, सुव्यवस्थेच्या दृष्टीने खूपच शांततामय आहे. या गावात देशभरातील सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत. पदाधिकारीही आहेत, मात्र निवडणूकीचे वातावरण असतानाही यांचा एकमेकांशी स्नेहसंबंध कायम असतो. वैयक्तिक कोणतीही टिका टिप्पणी टाळण्यावर त्यांचा भर असतो. अगदी मतदान सुरू असतानाही एका बाजूला सर्व पक्षांचे पदाधिकारी एकत्र चहापान करताना, हास्यविनोद करताना दिसून येतात. त्यामुळे एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार व अजित पवार हे देखील या गावाचे अजूनपर्यंत आम्हाला काही कळलेच नाही असे आपसूक बोलून गेले होते. फक्त ग्रामपंचायतच नाही, तर सहकारी सोसायटीतही हेच वातावरण आहे. राष्ट्रवादी किंवा कॉंग्रेस अथवा आताची भाजप असेल, कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता संचालक झाला असेल तरी त्याला संधी देण्याचे काम वरिष्ठ पदाधिकारी करीत असतात. मध्यंतरी राष्ट्रवादीची सत्ता असतानाही शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष पांडूरंग रायते यांनाही अध्यक्षपदाची संधी देण्यात आली होती. यापूर्वी देखील शिवसेनेचे तत्कालीन नेते दत्तात्रेय गुप्ते यांच्या गटाला सरपंचपद देण्यात आले होते.
गावातील कारभार तरूणाई कडे सोपवला असला तरी बुजुर्ग नेतेमंडळींची एक कोअर कमिटी यावरती नियंत्रण ठेवून असते. त्यांच्या माध्यमातूनच अशाप्रकारचे सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन सत्तेचा फायदा सर्वांना देण्याचा प्रयत्न होत असतो. या कोअर कमिटीमध्ये सध्या ही वेगवेगळ्या पक्षाचे नेते मंडळी आहेत आणि त्यांचा एकमेकांची संवादही चांगला आहे, त्या माध्यमातूनच या निवडी होत असतात.










