महान्यूज लाईव्ह टीम
काल २३ डिसेंबर ही तारीख होती. बरोबर पाच वर्षापूर्वी २३ डिसेंबर २०१६ रोजी मुंबईजवळच्या समुद्रात एक मोठा सोहळा पार पडला. पंतप्रधान मोदी यांनी एक समुद्रामध्ये एक भुमिपूजन सोहळा पार पाडला. नेहमीच्या भव्य दिव्य पद्धतीने हा सोहळा पार पाडला गेला.
समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य स्मारक उभे करण्याचे स्वप्न त्यांनी दाखवले होते. त्यापूर्वी झालेल्या निवडणूकांमध्ये शिवस्मारक उभारणी हा भाजपाचा सगळ्यात मोठा मुद्दा होता. आता पाच वर्षे झाली, अजूनपर्यंत त्या शिवस्मारकाची एक वीटही उभारलेली नाही. आता कोणी त्या विषयाकडे लक्षही देत नाही अशी स्थिती आहे.
परंतू शिवस्मारक उभारण्याची स्वप्न महाराष्ट्रातील जनतेला दाखविण्याची ही पहिली वेळ नाही. १९९६ सालच्या शिवसेना – भाजप सरकारनेही असेच स्वप्न दाखवले होते. त्यावेळी या स्मारकासाठी ७० कोटींची तरतूद करण्यात आली होती. तेव्हापासून फक्त या स्मारकासाठी होणाऱ्या खर्चाचे आकडेच फक्त वाढत आहेत. प्रत्यक्ष शिवस्मारक कधी होईल हे न सांगता येण्यासारखे आहे. ७० कोटीवरून सुरू झालेला या खर्चाचा आकडा आता २९०० कोटीवर पोचला आहे. या दरम्यान दोन वेळेस स्मारकाची जागाही बदलण्यात आली.
२०१४ ची निवडणूक भाजपाने शिवछत्रपतींचे नाव घेऊन त्यांचे जगातील सर्वाधिक उंच असे स्मारक उभारणार असे सांगून लढवली. त्यानंतर वर सांगितल्याप्रमाणे भव्य दिव्य भूमिपूजन झाले. पुन्हा सगळे शांत झाले.
अधूनमधून या पुतळ्याच्या उंचीवरून वाद तयार केले जातात. वर्ष दोन वर्षानी वेगवेगळे मुख्यमंत्री होडीत बसून सध्याच्या स्मारकाच्या ठिकाणी जातात. परत आले की फक्त स्मारकासाठी येणाऱ्या खर्चाची किंमत वाढते. प्रत्यक्ष कामाच्या दृष्टीने काहीच होत नाही.
यातून कोणताही राजकीय पक्ष बाजूला काढता येण्यासारखा नाही. गेल्या २५ वर्षात महाराष्ट्रातला प्रत्येक पक्ष आळीपाळीने, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रीपदावर बसला. काहीजण २-३ वेळा बसले. पण एकालाही हा मुद्दा तडीस नेता आला नाही.
ज्या महापुरुषाने उण्यापुऱ्या ५० वर्षाच्या आयुष्यात अनेक दुर्ग अक्षरश: घडवले, सजवले आणि त्याच्या वंशजांनी ते लढवले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे महाराष्ट्रातील राजकारणी लोकांसाठी गेली २५ वर्षं एक राखीव कुरण बनलंय यासारखी शरमेची बाब नाही.
लोकांच्या भावनेशी खेळायला छत्रपतींचा उपयोग वर्षानुवर्षं राजकारणी करत असताना आपल्याला त्याबद्दल काहीच वाटत नाही हे तर अजूनच खेदजनक आहे.
एकीकडे महाराजांचे अनेक किल्ले, त्यावरील भग्न दरवाजे, तटबंद्या, बुरुज अखेरचे श्वास घेत आहेत. त्या स्मारकांचं जतन व्हावं असं वाटणारी राजकारणी लोकं हाताच्या बोटावर मोजण्याइतकी सुद्धा नाहीत.
त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करुन, कोणीही मागणी केलेली नसताना, गेली २५ वर्षं समुद्रातलं शिवस्मारक बांधण्यासाठी, दर दोन-पाच वर्षांनी वेगवेगळे मुख्यमंत्री लाईफ जॅकेट घालून, बोटीतून खडकाची पाहणी करायला जातात आणि स्मारकाची किंमत वाढवून परत येतात हे जेव्हा आपण समजून उमजून घेऊ तोच सुदिन..
बाकी महाराजांचा इतिहास, त्यांचं कर्तृत्व, त्यांची निती आणि त्यांची ध्येयं ही महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी अभ्यासावी हे सांगणं सुद्धा फोल ठरेल ह्यात तीळमात्र शंका नाही.











