दिल्ली महान्यूज लाईव्ह
१५ डिसेंबर २०२१ पर्यंत देशातील ४७१ साखर कारखान्यातून ७५ लाख टनापेक्षा अधिक साखरेचे विक्रमी उत्पादन झाले असून चालू गळीत हंगामा अखेर ते ३१५ लाख टन होण्याचा अंदाज आहे. यात महाराष्ट्राने आघाडी मारली असून तेथील १८४ साखर कारखान्यांनी सर्वाधिक म्हणजे ३१.९० लाख टनाचे उत्पादन केले आहे.
हंगामाअखेर महाराष्ट्र ११० लाख टनाचे साखर उत्पादन करून यंदा देशात प्रथम क्रमांकावर राहील असे दिसते. त्या खालोखाल उत्तर प्रदेशाचा क्रमांक असून तेथील ११७ साखर कारखान्यात १८.६० लाख टनाहून अधिक साखरेचे उत्पादन झाले असून हंगामा अखेर ते १०७ लाख टन होण्याचा अंदाज आहे. कर्नाटकातील ६९ साखर कारखान्यातून १७.९० लाख टन नवे साखर उत्पादन झाले असून हंगाम अखेर ४८ लाख टनाचा साखर उत्पादनाचा अंदाज आहे असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने म्हटले आहे.
देशभरातील ४७१ साखर कारखान्यात आतापर्यंत (१५ डिसेंबर) ८२० लाख टन उसाचे गाळप झाले असून त्याचा सरासरी साखर उतारा ९.२२ टक्क्यापेक्षा अधिक आहे. गेल्या वर्षी १५ डिसेंबर २०२० पर्यंत देशातील ४५८ साखर कारखान्यांनी ८१९.५७ लाख टन उसाचे गाळप केले होते व त्यातून जवळपास ७४ लाख टन साखरेची निर्मिती झाली आणि सरासरी साखर उतारा ९.०२ टक्के होता. म्हणजेच यंदाचा विक्रमी गाळप हंगाम गतवर्षीच्या हंगामापेक्षा सर्वच बाबतीत थोडाफार वरचढच असल्याचे चित्र समोर येत आहे.
यंदा साखरेच्या सरासरी उताऱ्यात उत्तराखंड (१० टक्के) ,उत्तर प्रदेश (९.४०) ,महाराष्ट्र ( ९.३५ ) बिहार ((९.१५) व कर्नाटक (९) ही राज्ये अग्रेसर आहेत. त्यानंतर गुजरात (८.८५), पंजाब (८.७५), तामिळनाडू (८.५०), हरियाणा (८.१०), व आंध्र प्रदेश , तेलंगणात प्रत्येकी ८ टक्के अशी स्थिती आहे. अर्थात आता अधिक साखर उताऱ्याचा कालावधी नुकताच सुरु झाल्याने हंगामाअखेर सरासरी साखर उताऱ्यात चांगली वाढ दिसण्याचे तज्ज्ञांचे अनुमान आहे.
कोविड महामारीतही ऊस लागवड व साखर उत्पादन वाढले असून या महामारीच्या काळात घातलेली बंधने शिथिल केल्याचा फायदा साखर उदयोगाला होत आहे. इथेनॉल प्रकल्पही प्रगतीपथावर असून ३० नोव्हेंबर अखेर संपलेल्या इथेनॉल वर्ष २०२०-२१ मध्ये विक्रमी ३०२.३० कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा देशभरातील २७५ आसवनी प्रकल्पातून तेल कंपन्यांना झाला असून त्याद्वारे देशभरात सरासरी ८.१ टक्के मिश्रणाचे प्रमाण गाळले गेले आहे . या एकाच वर्षात इथेनॉल पुरवठ्याच्या माध्यमातून २० हजार कोटी रुपयांची मिळकत इथेनॉल पुरवठादारांना झाली असून ही भारत देशातील सर्वोत्तम विक्रमी कामगिरी ठरली आहे.
जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघ – यंदाच्या वर्षी साखर निर्यातीत देखील देशभरातील साखर कारखान्यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. वर्ष २०१९-२० मधील ५९ लाख टन साखर निर्यातीनंतर वर्ष २०२०-२१ मध्ये विक्रमी ७२ लाख टन साखरेची यशस्वी निर्यात झाली असून चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच ३५ लाख टन अनुदान विरहित साखर निर्यातीचे करार झाले आहेत व यात सहकारी क्षेत्राचा सुमारे ४० टक्के वाट आहे











