फलटण : महान्युज लाईव्ह
शीतल अहिवळे
१ डिसेंबरच्या अवकाळी पावसाने राज्यभर दैना उडवली. यात फार मोठी परवड झाली ती ऊसतोड मजुरांची. त्यांचे तात्पुरते निवारे पावसाने झोडपून काढले. झोपड्यात शिरलेल्या पाण्यामुळे अन्नधान्य, कपडे यासह सर्व साहित्याचे मोठे नुकसान झाले. याचबरोबर पावसामुळे ऊसतोडही बंद पडल्याने आवकही बंद पडली.
अशा काळात संकटाग्रस्तांच्या मदतीला धावण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. या पंरपरेला साजेसे काम फलटणच्या बिबी गावाच्या ग्रामस्थांनी केले. त्यांनी दाखविलेल्या या माणुसकीचे राज्यभरातून कौतुक होत आहे.
बिबी गावाच्या परिसरात त्या रात्री शरयू, श्रीराम, माळेगाव, स्वराज या साखर कारखान्यांच्या टोळ्यांतून ३०० जण येथे वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते. बीड, नगर, जामखेड परिसरातून आलेले हे सगळे लोक होते. अवकाळी पावसाने या सगळ्यांचीच दैना उडवली.
ही स्थिती बिबीच्या ग्रामस्थांना पाहवली नाही. सोशल मिडियातून मदतीसाठी आवाहन केले गेले. यातून रोख आणि वस्तूरुपाने मदत येऊ लागली. या मदतीतून या मजूर व त्यांच्या कुटुंबाची गावातील सरस्वती हायस्कूल, सांस्कृतिक हॉल, गावातील मंदिरे येथे राहण्याची व्यवस्था केली. त्यांची दोन दिवसाची जेवणाची व्यवस्था केली. दोन दिवसात मिळून ५५० जणांना ग्रामस्थांनी जेवण दिले. गावातील मुंबईत राहणाऱ्या लोकांनीही मदत पाठवली.
आता उर्वरित मदतीतून या कुटुंबांना किराणा किट देण्यासंदर्भात विचार सुरू आहे.
बिबी ग्रामस्थांनी ऐनवेळी केलेल्या मदतीबाबत ऊसतोड मजूरांनीही त्यांचे आभार मानले.
साखर कारखाने काय करताहेत
या ऊसतोड मजुरांच्या कष्टावर आपले कारखाने चालविणारे साखर कारखाने या संकटाच्या काळात मदतीसाठी का आले नाहीत असा प्रश्नही या निमित्ताने उभा राहतो आहे.
अवकाळी पाऊस आता दरवर्षीचाच झाला आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी येणाऱ्या या ऊसतोड मजुरांसाठी चांगले निवाऱ्याची सोय करणेही आता गरजेचे बनलेले आहे. यासाठी साखर कारखाने पुढाकार घेतील अशी अपेक्षा आहे.