बारामती : महान्यूज लाईव्ह
अवकाळी पावसाच्या तडाख्याने १ डिसेंबर रोजी राज्यात मोठ्या प्रमाणात लहान मोठी जनावरे मृत्यूमुखी पडली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना राज्यसरकार नुकसानभरपाई देणार असल्याची घोषणा राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. त्यांनी बारामती तालुक्यातील कुतवळवाडी येथे प्रत्यक्ष पाहणी केली.
राज्यात अवकाळी पावसामुळे पशुधनाची फार मोठे नुकसान झाले आहे. १ डिसेंबरला झालेल्या अवकाळी पावसाने लहान मोठी जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.राज्यभरात याचा फटका बसला असून पुणे जिल्ह्यामध्ये सुमारे 2000 जनावरांची मृत्यू झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये 200 जनावरे, नाशिक जिल्ह्यामध्ये 515 जनावरे, अहमदनगर जिल्ह्यामध्ये 713 जनावरे आणि रायगड येथे 2 जनावरे मृत्यूमुखी पडल्याची माहिती देण्यात आली. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यात 750, आंबेगाव तालुक्यात 403, शिरूर तालुक्यात 381, पुरंदर तालुक्यात 150, मावळ तालुक्यात 110, खेड तालुक्यात 94, बारामती तालुक्यात 88, दौंड तालुक्यात 44 व हवेली तालुक्यात 23 एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनावरांचा मृत्यूचा आकडा असून यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यमंत्री भरणे पुढे म्हणाले, अवकाळी पावसामुळे मृत्यूमुखी पडलेल्या शेळी मेंढी करिता रु. 4000, गाई करिता रु. 40000, बैल रु.30000 , इतकी नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री. मुकणे आणि प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे आदी उपस्थित होते.