गुंजवणी प्रकल्पाच्या भूलभुलैयामुळे शेतकरी हैराण
माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर, दि. २६ – गुंजवणी प्रकल्पाच्या नकाशामध्ये भोर व वेल्ह्यातील गावातील ३० ते ४० टक्के शेतीचे क्षेत्रच दिसत नसल्याने या भागातील शेतीच कोरडीच राहणार आहे. तसेच प्रकल्पाच्या पाणी वाटपामध्ये अनेक त्रुटी असून शेतकऱ्यांना ठेकेदार कंपनीने दिलेले नुकसानभरपाईचे धनादेश सुद्धा वटले नसल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारातून शेतकऱ्यांनी मिळवली आहे. गुंजवणी प्रकल्प म्हणजे भूलभुलैया असल्याचे आरोप लहू शेलार यांनी केले आहे.
भोर तालुक्यातील शेतकरी लहू हरीभाऊ शेलार, सोमनाथ मधुकर उकिरडे व प्रशांत वाल्हेकर या शेतकऱ्यांनी माहितीच्या अधिकारातून माहिती मागविली होती. यामध्ये वेल्हा आणि भोर तालुक्यातील ५० ते ६० गावातील अनेक शेतीचा भाग गुंजवणी प्रकल्पाच्या नकाशामध्ये दिसत नाही.
ठराविक गट नकाशात निर्देशीत करण्यात आले आहेत. मुळ अहवालानुसार ज्या ठिकाणावरुन कँनाल जात होता, ते क्षेत्र सोडुन नविन अहवालात नदीच्या जवळुन बंद पाईपव्दारे पाणी जाणार आहे व तेथुन उपनलिकाव्दारे शेतीसाठी पाणी वाटप होणार आहे. जमिनीवर भूसंपादनाचे पडलेले शिक्के निघाल्याशिवाय पाईपलाईनचे काम सुरु करू नये अशी मागणी होत आहे.
कुरंगवडी, पारवडी, सोनवडी, आंबवणे, करंजावणे, चिंचले बुद्रुक, चिंचले खुर्द, अडवली, मार्गासनी, मालवली, विंझर, लाशिरगाव, कोंढवली, वडगाव, सोंडे कार्ले, सोंडे सरपाले, सोंडे हिरोजी, सुरवड, सोंडे माथना, सोंडे, तांबड, हातवे खुर्द, हातवे बुद्रुक, भिलारेवाडी, मोहरी, मोहरी बुद्रुक, आळंदेवाडी, कासुर्डी व इतर डोंगराच्याकडेच्या व इतर गावातील शेतकऱ्यांची अनेक शेती या पाईपलाईनद्वारे भिजणार नसल्याची माहिती अधिकारात असल्याचे शेलार यांनी नमूद केली आहे.
हायड्रोप्रेशर तंत्रज्ञाने डोंगराच्या पायथ्यापर्यंत पाणी पोहचणार असल्याचा दावा केला जातो, तर मग गावच्या नकाशातील इतर गट का वगळण्यात आले? असा सवाल होत यामुळे भोर आणि वेल्ह्यातील शेतकरी गावनिहाय नकाशा प्रसिद्ध करण्याची मागणी होत आहे.
नुकसान भरपाईचे दर ठरलेले नसतानादेखील रुवी टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने शेतकऱ्यांना दिलेले तुटपुंज्या रकमेचे अनेक धनादेश वटले. तालुक्यातील गावात रजिस्टर पाणी वापर संस्था स्थापन केली नसून शेतकऱ्यांना विश्वासात न घेता प्रकल्पाचे काम चालू आहे.
वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीसाठी धरणातून डिसेंबर ते मे या कालावधीमध्ये आवर्तने सोडण्याचे लेखी राजपत्रित आदेश द्यावे, अन्यथा गुंजवणी प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी आंदोलने करतील, तसेच या प्रकल्पाच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात येईल’ असा इशारा शेतकरी लहू शेलार व सोमनाथ उकिरडे यांनी दिला आहे. तर शेतकऱ्यांना दिलेल्या धनादेशाबाबत माहिती नसल्याचे नसरापूर शाखा अभियंता नयन गिरमे यांनी सांगितले.
दिगंबर डुबल, कार्यकारी अभियंता – संबधित शेतकऱ्यांना वेळोवेळी सविस्तर माहिती दिली असून काहीजण चुकीचे संदेश देत आहेत. मूळ प्रकल्पामध्ये समाविष्ट असणारी गावे आणि त्या भागातील समावेश असणाऱ्या क्षेत्राला पाणी देणार आहोत.











