दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : नुकतेच चार दिवसांपूर्वी एका महिलेचा खून झाल्याने हा खून केल्याचा संशय त्यांच्याविरोधात नातेवाइकांनी व्यक्त केला होता आणि त्यानुसार पोलिसांनी चक्क बेळगाव पर्यंत जाऊन तपास केला.. आणि संशयिताला ताब्यात घेतले.. हा ताब्यात आलेला खुनी चक्क दोन वर्षांपूर्वी स्वतःच्या पत्नीचाच खूनी निघाला. पत्नी चा खून करून डोंगरकपारीत दफन केलेल्या आरोपीने त्याच्या पत्नीच्या बेपत्ता होण्याची फिर्याद पोलिसांकडे दिली होती.
तालुक्यातील व्याहळी येथील खुनातील फरारी असलेला आरोपी नितीन आनंदराव गोळे वय ३८ याला अखेर बेळगाव येथे भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे व भुईंज पोलीसांनी सापळा रचून अटक केली.
त्याने चौकशीदरम्यान स्वत:ची पत्नी मनीषा नितीन गोळे (वय ३४, रा. व्याजवाडी) हिचा १ मे २०१९ रोजी खून केला अशी कबुली दिली. पत्नीचा मृतदेह डोंगर परिसरात पुरून टाकल्याची धक्कादायक माहिती भुईंज पोलिसांना दिली. त्याचबरोबर संध्या शिंदे हिचा देखील गळा आवळून खून केल्याची कबुली दिल्याने भुईंज पोलिसांसह वाई तालुक्यातील जनतेमध्ये खळबळ उडाली आहे.
धोम येथील संतोष पोळ प्रकरण लोकांच्या अजून स्मरणात असतानाच या घटनेची पुनरावृत्ती पुन्हा वाई तालुक्यात झाल्याने वाढीसह सातारा जिल्हा हादरून गेला आहे.
भुईंजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे व त्यांच्या भुईंज पोलीसांनी या दुहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश करीत महिलांच्या खुनाला वाचा फोडल्याने त्यांचे जिल्हा पोलीस प्रमुख अजितकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे खराडे यांच्यासह वाई तालुक्यातील जनतेने कौतुक केले.
भुईंज, सातारा येथून बेपत्ता झालेल्या विवाहीतेचा खून झाल्याची फिर्याद आल्यावर भुईज पोलीसात खूनाचा गुन्हा दाखल झाला. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले होते त्यानंतर २४ तासात गुन्हा उघडकीस आणण्यात भुईंज पोलीसांना यश आले असल्याची माहिती सातारा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी दिली. ३१ जुलै रोजी रात्री दहा वाजता सातारा येथून संध्या विजय शिंदे (वय ३४ रा . कारी, ता .जि . सातारा ) या बेपत्ता झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस स्टेशनला दाखल झाली होती.
दरम्यान, मंगळवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता भुईंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत आसले (ता.वाई) येथील ऊसाच्या शेतात एक मृतदेह आढळून आला. सदर मृतदेहाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यासोबत सापडलेले आधारकार्ड व इतर कागदपत्रे यांची पडताळणी केली.
त्यानंतर सदर मृतदेह हा संध्या शिंदे हिचा असल्याची खात्री झाल्यानंतर पोलीसांनी शवविच्छेदनासाठी सातारा येथे पाठविला. मृतदेहाचे बांधलेले हात आणि तोंडावरील जखमांवरून हा खुनच असावा असा प्राथमिक अंदाज बांधून सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे व भुईंज पोलीसांनी घटनास्थळापासून तपासाला सुरुवात केली.
तांञिक व गोपनीय माहितीच्या आधारावर संशयितापर्यत पोहोचण्यासाठी विशेष पथक रवाना केले. बुधवारी सकाळी कारी (ता. जि. सातारा) येथे अंत्यसंस्कार झाल्यानंतर नातेवाईकांनी भुईंज पोलीस ठाण्यात येवून संध्या शिंदे यांचा खून नितीन आनंदराव गोळे (रा. व्याहळी ता. वाई) यानेच केला असल्याची फिर्याद दिली व तातडीने संशयित आरोपीला अटक करा अशी मागणी केली.
यावरून भुईंज पोलीसांनी संशयित आरोपी नितीन गोळे याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न चालू केले होते. परंतु नितीन गोळे हा सापडत नव्हता. त्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, गुन्हे शोध पथकातील रविराज वर्णेकर, प्रसाद दुधस्कर, तुकाराम पवार, अतुल आवळे, शिवाजी तोरडमल, आनंदराव भोसले,बापूराव धायगुडे, प्रियांका कदम, दिपाली गिरी- गोसावी, सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, हवालदार सुधीर बनकर, संतोष सपकाळ, संतोष पवार, रवी वाघमारे, सचिन ससाणे यांनी पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील, वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे- खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध घेतला.
नितीन गोळेच्या शोधासाठी वैराटगड पायथ्याशी असलेला डोंगरद-या परिसर रात्रंदिवस फिरून शोधण्याचा प्रयत्न केला असता अपयश आले होते. नितीन गोळे हा पोलिसांना गुंगारा देऊन थेट कर्नाटकातील बेळगाव परिसरात पसार झाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांना ९ ऑगस्ट रोजी मिळाली होती.
त्यांनी सहका-यांसोबत बेळगाव येथे सापळा रचून बुधवार दिनांक १० रोजी ५ वाजणेच्या सुमारास नितीन गोळे याच्या मुसक्या मोठ्या शिताफीने आवळल्या. गोळे याला वाई येथील न्यायालयासमोर हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे हे करीत आहेत.