दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
कोल्हापूर, सांगलीतील महापुरामुळे महामार्गावर आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज घेत प्रशासनाने महामार्ग प्रवासासाठी बंद केला आहे. या दरम्यान शेकडो ट्रकचालक तसेच अनेक प्रवासी वाहने या रस्त्यावर अडकून पडलेली आहेत. रस्ता नेमका कधी सुरू होईल याची कोणतीही कल्पना नाही. नदीच्या पुराच्या पाण्यावर त्यांचे जाणे अवलंबून राहणार आहे, याची माहिती मिळताच भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी या रस्त्यावर अडकलेल्या 500 मालवाहतूक ट्रक मधील चालक आणि वाहकांच्या भोजनाची व्यवस्था केली.
जिथे ट्रक थांबवण्यात आलेले आहेत, त्या ठिकाणी अजूनही मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जेवणाचे साहित्य ट्रकमध्ये असले, तरीही जेवण तयार करता येत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच या ट्रकचालक आणि वाहकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठीची ही व्यवस्था अनेक ट्रक चालकांना मोठा दिलासा देऊन गेली.
सातारा महामार्गावरील आनेवाडी टोलनाका येथे काल पासून पोलिसांनी या ट्रक चालकांना थांबवलेले आहे. अशावेळी कोणीही अपेक्षा न करता, न मागणी करता उदयनराजे भोसले यांनी आपणहून केलेल्या या मदतीमुळे सारेच भारावून गेले. जेवण कसे तयार करायचे? हा प्रश्न आमच्यासमोर होता, मात्र उदयनमहाराज यांनी यामध्ये लक्ष घालून आमची मोठी मदत केली. महाराष्ट्रातील ही मदत आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. संकटाच्या काळात येथील सर्व लोक कसे धावून येतात याची प्रचिती या निमित्ताने आम्हाला आली अशी प्रतिक्रिया परराज्यातील चालकांनी व्यक्त केली.
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी
सहकारी जितेंद्र खानविलकर यांच्याकडे ५०० माणसांचे तयार भोजन देऊन ते भोजन आनेवाडी टोल नाका परिसरात संकटांत सापडलेल्या ड्रायव्हर आणी वाहकांना द्यावे तेथील आनेवाडी टोलनाका येथील कर्मचारी पांडुरंग पवार, अविनाश फरांदे, रोहीत सावंत, प्रवीण शिंगटे, इतर कर्मचारी वर्गाने भोजन वाटप करण्याच्या सुचना दिल्या होत्या.











