भुकेल्या ट्रक चालकांच्या मदतीले धावले विक्रमदादा युवामंचचे कार्यकर्ते;महामार्गावर अडकलेल्या ३०० ट्रकचालकांना अल्पोहर, जेवण
माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर – सगळीकडे हाहाकार असला, अगदी घराशेजारीही मृत्यूचे तांडव दिसत असले, तरी देखील एकमेकांच्या तोंडात घास भरवण्याची परंपरा येथील दऱ्याखोऱ्यातील, बारा मावळमुलखाची आहे.. इथला सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून जातो.. इथे तर घरातच संकटाच्या उतरंडी आहेत, म्हणूनही तो खचून जाणार नाही.. तो मदतीला धावणारच.. याचाच प्रत्यय देत भोर परिसरात रस्त्यावर अडवलेल्या ट्रकचालक, वाहकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी मावळे धावून गेले.. त्यांनी दाखवलेल्या या माणूसकीच्या संवेदनशील हातांनी राज्यातील, परराज्यांतील ट्रकचालक, प्रवाशीही भारावून गेले…
कोल्हापूर, सांगली, सातारा, चिपळूणमध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे – सातारा महामार्गावरून जाणारे सर्व अवजड वाहने पोलिसांनी सुरक्षतेसाठी अडवली आहेत. अचानक ही वाहने अडवली गेल्याने फारशी तजवीज न करून निघालेल्या वाहनचालकांपुढे भीतीचे साम्राज्य पसरले. अगदीच रस्त्यावर थांबता येईल, ट्रक, वाहनात झोपता येईल, मात्र भुकेने तोंड वर काढले की काय करायचे हा प्रश्न उभा राहीला..आणि मग काय, धावून आला ना.. इथला बारा मावळमुलखातला मावळा..! गवताच्या पात्यालाही इथेच भाले फुटले आणि माणूसकीच्या देवांनी येथेच राज्य केले, असा हा परिसर, मग तेथे कोणीतरी रस्त्यावरचा कसा भुकेला राहील?… भुक आणि तहानेने व्याकूळ झालेल्या ट्रकचालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना, रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही विक्रमदादा खुटवड युवामंचच्या कार्यकर्त्यांनी धाव घेत अल्पोपहार, जेवण आणि पाण्याच्या बॉटल देऊन माणुसकीचे दर्शन घडविले.
पुणे – सातारा महामार्गावर जागोजागी शेकडो ट्रकचालक आणि किन्नर अडकले असल्याच्या पार्श्वभूमीवर विक्रमदादा खुटवड युवामंचचे पै. धनेश डिंबळे यांच्या पुढाकारातून तब्बल ३०० चालक आणि सहकाऱ्यांना शनिवारी सकाळपासून बिस्कीट पुडे, पोहे, पाणी बॉटल, तसेच दुपारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे, सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पै. धनेश डिंबळे, भोर पत्रकार संघाचे संजय इंगुळकर, किरण भदे, माणिक पवार, युवामंचचे अमीर बाठे, माऊली राऊत, संजय यादव, किशोर चव्हाण, नारायण पांगारकर, पै. आकाश गाडे, पै. अनिकेत गाडे, राहुल गाडे, तुषार शेडगे, दीपक खंडागळे, संजय डिंबळे, तुषार डिंबळे, सौरभ खुडे उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे म्हणाले कि, परजिल्ह्यात ओढवलेल्या परिस्थितीमुळे अवजड वाहने थांबविली गेली आहेत. अचानक अडचणी अथवा संकटवेळी अकल्पित झालेली मदत ही खऱ्या अर्थाने पुण्याईचे काम आहे. अशाच प्रकारे विक्रमदादा युवामंच, धनेश डिंबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली मदत ही लाखमोलाची असल्याची भावना घोरपडे यांनी व्यक्त केली.
संकट सर्वावर ओढवतात अशावेळी माणुसकी म्हणून अडकलेल्या ट्रक बांधवाना विक्रमदादा युवामंचच्या वतीने दोन्ही वेळची जेवणाची व्यवस्था केली असून सामाजिक काम करण्यासारखे दुसरे कोणतेही समाधान नसल्याची प्रांजळ भावना धनेश डिंबळे यांनी व्यक्त केली. महामार्गावरील कामथडी, धांगवडी, किकवी, सारोळा परिसरात अडकलेल्या ट्रकचालक, त्यांचे सहायक यांना जागेवर जाऊन जेवण देण्यात आले. तर कामथडी येथील ऐश्वर्या नर्सरीच्या वतीने तांदूळ देण्यात आले.