मुंबई : महान्यूज लाईव्ह
स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत पंडितजींचं अमूल्यं योगदान आहे. आधुनिक भारताच्या विकासाचा उंच मनोरा हा पंडितजींनी त्याकाळात रचलेल्या भक्कम पायावर खंबीरपणे उभा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांना आदरांजली वाहिली आहे.
भारताचे पहिले पंतप्रधान, आधुनिक भारताचे शिल्पकार स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना ना. अजित पवार यांनी अभिवादन केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या कुटुंबानं केलेला त्याग, स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत त्यांनी दिलेलं योगदान देशवासियांच्या चिरंतन स्मरणात राहणार आहे. पंडितजींनी उभारलेल्या शैक्षणिक, संशोधन संस्था, पायाभूत प्रकल्पांचा रचलेला पाया, युवकांच्या नेतृत्वंविकासाला दिलेली दिशा, लोकशाही रुजवण्यासाठी, भक्कम करण्यासाठी केलेले प्रयत्नं हे सारं अलौकिक आहे.
पंडितजींनी दाखवलेल्या दूरदृष्टीतून आजचा भारत घडला आहे. आधुनिक भारताच्या विकासाचा उंच मनोरा हा पंडितजींनी त्याकाळात रचलेल्या भक्कम पायावर खंबीरपणे उभा आहे, याचं स्मरण करुन मी त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.










