माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर – शिवगंगा खोऱ्यातील जाणारा रिंगरोड विकासाचा नव्हे तर शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा असल्याने रिंगरोडला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर निदर्शनास आणून दिले. रिंगरोड बाबत आणि हवेलीतील २३ गावे पीएमआरडीमध्ये समाविष्ट झालेल्या गावांची समस्याबाबत निवेदन शिंदे यांना देण्यात आले. याबाबत तातडीने मंत्रालयात स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे शिंदे यांनी ग्वाही दिली.
रिंगरोडला विरोध असणाऱ्या केळवडे ग्रामस्थ आणि रिंगरोड कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांची केळवडे ( ता. भोर ) काळूबाई मंदिर येथे भेट घेऊन रिंगरोडला विरोध असल्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, सहंपर्कप्रमुख कुलदीप कोंडे, रिंगरोड हटाव कृती समितीचे शामसुंदर जायगुडे, महेश कोंडे, जितेंद्र कोंडे, शांताराम जायगुडे, बाळासाहेब धुमाळ, राजेंद्र कोंडे, मोहन धुमाळ, भाऊसाहेब जाधव, धनाजी धुमाळ, किरकीटवाडीचे सरपंच गोकुळ करंजावणे, दशरथ खिरीड, गौरव करंजावणे, सचिन पासलकर, मंच्छिंद्र शेलार आदी शेतकरी उपस्थित होते.
कुलदीप कोंडे यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका मांडताना म्हणाले की, विकासाला आमचा विरोध नाही. पण तो विकास होत असताना स्थानिक शेतकरी भुमीहीन व उध्दवस्त होणार आहे. रिंगरोड होत असताना स्थानिक शेतकऱ्यांची सुपीक व बागायत जमीन पूर्ण बाधित होत आहे. त्याच्या उपजीविकेचे साधन नष्ट होणार असल्याचे सांगत कोंडे यांनी सुपीक जमिनीमधून जाणारा रिंगरोड रद्द करून तो डोंगराच्या कडेने पडीक जमिनीमधून करावा. बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा तसेच ९.९० मीटर रुंदी असणारा रोडची रुंदी कमी करून किमान ३६ मीटर करण्यात यावी. रिंगरोडव्या बाजूने बंधिस्त किंवा कंपाउंड नसावे तो खुला असावा, संपूर्ण रोडच्या बाजूने सर्विस रोड असावा अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली.
रिंगरोड सुपीक भागातून न जाता रिंगरोडसाठी पर्यायी मार्ग काढून रुंदी कमी करून रिंगरोड खुला करण्याची मागणी बाधित शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे. तसेच रिंगरोडमध्ये पिकावू बागायती शेतजमीन जात आहे. शेतकरी भुमिहीन होत आहेत, घरे, मंदिरे जात असून नागरीक बेघर होणार असून ओढे, नाले, पाणंद रस्ते अडले जात आहेत. फळबाग लागवड उध्वस्त होत आहे. शेतीच्या पाण्याच्या विहीरी, पाईपलाईन बाधित होणार आहे. उर्वरीत शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच पाँली हाऊस, पोल्ट्री फार्म उद्धवस्त होत आहेत अशा शेतकऱ्यांची तक्रारी मंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐकून घेतल्या. यावर तातडीने मंत्रालयात बैठक घेणार असल्याची ग्वाही शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिली.











