संपादकीय
राज्यात कोरोनाची चाहूल लागली..पुढे काही दिवसांतच कोरोनाची भीती दिसू लागली आणि त्या काळातच रस्त्यांवर फिरणाऱ्यांना पोलिसांचीही भीती वाटू लागली. पोलिस मारहाण करतात. अंग सुजवतात या कल्पनेने रस्ते ओस दिसू लागले. रस्त्यांवर फक्त पोलिस आणि चौकाचौकात त्यांची गस्त दिसू लागली. राज्याच्या पोलिसांच्या खात्याच्या मंत्र्यांनी देखील आता पोलिस गप्प बसणार नाहीत, असे स्पष्ट केले आणि पोलिसांना बळ मिळाले. मात्र याचा परिणाम असा झाला की, राज्यातील शहरांमधील चांडाळ चौकडी, जी गुमनाम शहर कसे दिसते, हे पाहण्यासाठी बाहेर पडू लागली होती, त्याला आळा बसला. पुढे हे अति झाल्याचा मुद्दा करीत काहींनी गळे काढण्यास सुरवात केली आणि पोलिसांची तेल लावलेली दंडुकी पुन्हा शांत झाली. मात्र त्यानंतर पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि पोलिसच पुढे सरसावले.
या राज्यात कोरोनाच्या सुरवातीच्या काळात फक्त पोलिस आणि डॉक्टर, परिचारिका एवढेच काम करीत आहेत असेच दिसत होते. शहरेच्या शहरे आणि गावे, खेडी अगदी वाड्यावस्त्यादेखील सुनसान झाल्या होत्या. रात्रीचा दिवस करीत डोळ्यात तेल घालून पोलिसांनी कोरोनाचा एकही पंछी त्यांच्या आखून दिलेल्या कंटेनमेंट झोनमध्ये शिरणार नाही याची तसदी घेतली. ही तसदी घेताना कधीतरी बाहेर उगीच फिरणाऱ्यांच्या चौकशा करता करता कोरोनाग्रस्तांच्याच संपर्कात पोलिसदादा नकळत येऊ लागला आणि कोरोनाची लागण पोलिसांना होत गेली. अर्थात कोरोनाची लागण होऊ शकते याचा धोका मोठा आहे हे माहिती असूनही या राज्यातला हा कोरोनायोध्दा अजिबात मागे हटला नाही. तो लढतच राहीला. या लढाईत १६ कोरोनायोध्दे शहीद झाले. राज्यातल्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत बळी गेलेल्या पोलिसांच्या आकड्यापेक्षा हा आकडा अधिक आहे. आजपर्यंत राज्यात तब्बल १६६६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. मागील अवघ्या ४८ तासांत २७८ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. अर्थात राज्यात ४७३ जणांनी कोरोनावर आतापर्यंत मातही केली आहे. मात्र तरीदेखील लष्कराच्या भाकऱ्या भाजणाऱ्यांनी स्वतःची किंमत मोजत आयुष्य समर्पित करावे लागलेल्या पोलिसांना नेहमीच आपल्यातीलच काही सहकाऱ्यांच्या पैशाच्या हव्यासापायी टिकेला, बदनामीला सामोरे जावे लागते. अर्थात या कोरोनाच्या काळातही काही पोलिसांनी आपली चाल काही सोडली नाही. एखादे दुकान उघडे दिसायचा अवकाश, त्या दुकानदारावर प्रचंड दबाव आणत तुझ्यावर गुन्हा दाखल करतो, तुला तीन वर्षे शिक्षा होईल अशीच कागदपत्रे रंगवतो असे धमकावत लाचखोरीही केली. मात्र तरीदेखील कोरोनाच्या लढाईत प्रामाणिकपणे लढणाऱ्यांच्या पुढे ही कवडीमोल संख्या आहे.
पोलिसांनी या कोरोनाच्या लढाईत प्रयत्नांची व कामाची शर्थ केली. मात्र स्वतः पोलिसही कोरोनापुढं पालापाचोळाच ठरले. शेवटी पोलिस देखील आहे माणूसच ना? माणसाच्या अंगी असलेले सगळे गुण त्याच्यातही आहेत. पोलिसांना कधी हार तर कधी प्रहार स्विकारावे लागतात. म्हणूनच याही पोलिसांना कोरोनाने ग्रासले. तरीदेखील त्यांनी अजूनही ब्र काढलेला नाही. मिळेल ती सेवा आरामात करीत आहेत. ज्या महाराष्ट्राने पोलिसांना दंडुक्यांनी मारताना पाहिले, त्याच महाराष्ट्राने या पोलिसांना शहरातील नागरिकांना बाहेर पडू नका असे सांगताना गोड गळ्याने गाताना पाहिले.
कोरोनाच्या काळात पोलिसांची प्रतिमाच बदलून गेली. ज्या पोलिसांना देशातील पहिल्या नंबरचे भ्रष्टाचारी खाते असे हिणवले जात होते, त्याच पोलिसांच्या संचलनावेळी पोलिसांवर पुष्पवृष्टी होताना आम्ही पाहिले. गच्चीत, खिडकीत, गॅलरीतून कोणी ना कोणी टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त करताना आम्ही पाहिले. भीतीपोटी नाही, तर आदरापोटी, अभिमानापोटी आम्ही पोलिसांना सलाम करताना अनेकांना पाहिले. पोलिस खिशातून पैसे काढतात, भांडणानंतर दोन्ही गटाकडून पैसे घेतात अशी ख्याती आम्ही जिथे ऐकली होती, त्याच ठिकाणी भुकेलेल्यांना स्वतःचा डबा देणारा पोलिसदादा आम्ही अनुभवला. स्वतः मधुमेहाने ग्रस्त असतानाही ड्यूटी इज ड्यूटी मानून हटून उभा राहीलेला बंदोबस्तातला पोलिसदादा आम्ही पाहिला. घरातल्या दीड वर्षाचा चिमुकला बाहेर कोरोना आहे, म्हणून जाऊ नको असं रडत असतानाही त्याच्या बापापेक्षा समाजातले अनेक बाप जिवंत राहावेत या भावनेने भावनेला आळा घालत कर्तव्याला श्रेष्ठ मानणारा पोलिस आम्हीच अनुभवला. या कोरोनाने आम्हाला काय शिकवले? तर ज्याच्यावर आपण टिकेचे गोळे फेकतो, त्याच्या चांगुलपणाने भारावून जाऊन त्याच्यावर फुले फेकण्याची वेळ आणली…धन्य आहे तो कोरोना, ज्याने पोलिसांची दुसरी बाजूही समाजापुढे आणली…फक्त हीच बाजू सातत्याने समाजापुढे राहावी, जी पूर्वी काळी बाजू आम्ही ऐकली होती, ती पुन्हा कानी पडू नये, एवढी आदर्श ताकद पोलिसांच्या पाठीशी उभी राहावी हीच यानिमित्ताने अपेक्षा!











उत्तम