दादाराम शेंडे यांचा गंभीर आरोप! योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करुन समिती च्या दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
निमगाव केतकी येथील शेंडेमळा येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सन २०१२-१३ मध्ये झालेल्या ३४ लाख रूपयांच्या अंदापत्रकीय रकमेच्या नळ पाणी पुरवठा योजनेची कामे बोगस करण्यात आली असून, या योजनेसाठी बोगसपणे ११६ कामगार काम करत असल्याचे दाखवण्यात आले असा गंभीर आरोप समता परिषदेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष दादाराम शेंडे यांनी पत्रकार परिषदेत केला.
विशेष म्हणजे या दाखवण्यात आलेल्या कामगारांपैकी अनेक कामगार योजनेअगोदरच मयत झाले असल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण कामाची चौकशीची मागणी दीड वर्षांपासून होत असताना अधिकारी वर्गाकडून भ्रष्टाचार करणा-यांना पाठबळ दिले जात असून त्यांच्याकडून चौकशीस जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे.
या प्रकरणाची चौकशी करुन दोषी अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी व संबंधित इतरांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शेंडे यांची आहे. तात्काळ कारवाई न झाल्यास २२ जूनपासून निमगाव केतकीच्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
दादाराम शेंडे यांनी पत्रकार परिषदेत या कामावर आक्षेप घेत अनेक आरोप केले आहेत. या कामाबाबत आपल्याकडे सर्व पुरावे असल्याचे सांगत निमगाव केतकी येथील शेंडेमळा येथे योजना समितीमार्फत झालेल्या या नळ पाणी पुरवठा योजनेत काम करणारे दाखवण्यात आलेले ११६ कामगारांपैकी बरेच कामगार हे योजनेअगोदरच मयत झाले होते. या मयत असणा-या जवळपास १०ते १५ नागरिकांचे मृत्यू दाखले आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला.
सदर योजनेच्या चौकशीसाठी गेल्या दीड वर्षांपासून पुणे जिल्ह्याचे पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता ,तालुक्याचे गटविकास अधिकारी, पंचायत समिती चे अभियंता यांच्याकडे याच वेळा चकरा मारल्या. पत्रव्यवहार केले. परंतु सदर अधिकारी व पाणी समितीने अध्यक्ष व सचिव यांच्याकडे लागेबांधे निर्माण होवून सदर योजनेच्या चौकशी साठी वारंवार टाळाटाळ केली जात आहे असा आरोप शेंडे यांनी पत्रकार परिषदेत केला.











