मंजूर केलेला निर्णय रद्द करावा व इंदापूर च्या २२ गावांना हक्काचे पाणी देत असल्याचे लेखी पत्र घेतल्या शिवाय मागे हटणार नाही…
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
उजनी धरणाच्या पाणी लवादाने पुर्वीच १०० टक्के वाटप केले असताना आता बेकायदेशीरपणे हे पाणी बावीस गावांसाठी मंजूर केले. उपमुख्यमंत्री अजित पवार व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे जलसंपदा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे पाणी मंजूर केले,असा आरोप जनहित शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी केला आहे.
मंजूर केलेल्या पाण्याचा हा निर्णय त्वरीत रद्द करावा व तसे लेखी ठोस पत्र मिळावे, तसेच इंदापुर तालुक्यातील २२ गावच्या शेतक-यांच्या हक्काचे पाणी खडकवासला किंवा मुळशी धरणातून देत असल्याचे लेखी पत्र मिळाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा पवित्रा देशमुख यांनी घेतला आहे.
वेळ आल्यास इंदापूरच्या शेतक-यांच्या हक्काच्या पाण्यासाठी खडकवासला किंवा मुळशी धरणातून मिळवून देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतक-यांसह इंदापूर तहसिल कचेरी समोर बेमुदत आंदोलन करणार असल्याचे प्रभाकर देशमुख यांनी जाहीर केले.
उजनी धरणाच्या पाच टीएमसी पाणी प्रश्नी सोलापूर जिल्ह्याचे नेते व जनहित शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख हे सध्या सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसमवेत पुणे-सोलापूर च्या हद्दीवरील भिमानगर येथील उजनीच्या कार्यालयासमोर आंदोलनास बसले आहेत. आज त्या उपोषण आंदोलनाचा पंधरावा दिवस आहे.
प्रभाकर देशमुख म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व सोलापूर जिल्हा पालकमंत्री तथा जलसंपदा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील बावीस गावांसाठी उजनी धरणाचे पाच टीएमसी पाणी मंजूर केले. वास्तविक पाहता इंदापुरचा शेतकरी हा आमचा दुश्मन नाही तो सुद्धा शेतकरीच आहे, मात्र या उजनी धरणाचा पाणी लवादाने पुर्वीच १०० टक्के वाटप केलेले असताना आता बेकायदेशीरपणे हे पाणी २२ गावांसाठी मंजूर केले.
देशमुख म्हणाले, शरद पवार साहेब हे देशाचे व राष्ट्रीय नेते आहेत. आता पवारसाहेबांनी जबाबदारी समजून इतर धरणांतून इंदापूरच्या शेतक-यांच्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न करावा. जयंत पाटील यांनी माध्यमांना सांगितले की, सोलापूर जिल्ह्यातील पाच टीएमसी पाणी वाटपाचा निर्णय रद्द करीत आहोत. पण तसा लेखी व ठोस आदेश मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. तसेच इंदापूरच्या बावीस गावच्या हक्काचे पाणी वाटपाचा ठोस व लेखी आदेश मिळाल्याशिवाय या आंदोलनातून आपण मागे हटणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
जयंत पाटील खोटारडे आहेत, असा आरोप देशमुख यांनी केला. पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील व इंदापूर तालुक्यातील शेतक-यांची फसवणुक केली आहे, म्हणून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत त्याबाबतचे निवेदन आम्ही टेंभुर्णी पोलिस ठाण्यात देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्रहार संघटनेचे दत्तात्रय व्यवहारे, संभाजी ब्रिगेडचे सचिन जगताप, रयत क्रांती संघटनेचे प्रा. सुहास पाटील, भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन जगताप, माढा खरेदी विक्री संघ माजी संचालक गायकवाड, प्रहार संघटनेेेचे माढा तालुका अध्यक्ष मल्हारी गवळी आदी उपस्थित होते.











