फळबागांसह आंबा पिकाचे व तरकारिचे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान
दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
गेल्या तीन दिवसांपासून वाई तालुक्यातील गावांमध्ये चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्या; तर विद्युत मंडळांच्या विजेच्या खांबांवर मोठमोठी झाडे कोसळल्याने लोखंडी व सिमेंटचे पोल तुटले तर काही ठिकाणी वाकडे झाले. वाईच्या पश्चिम भागातील अतिदुर्गम भागातील शाळांचे पत्रे उडाले तर काही ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्या. यामुळे तालुक्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम संबंधित गावांतील मंडल अधिकारी व तलाठी युध्दपातळीवर करीत आहेत. काल दिवसरात्र पडलेल्या पावसाच्या मंडलनिहाय नोंदी पुढील प्रमाणे, पसरणी 16 मिमी., पाचवड 27 मिमी., धोम 15 मिमी., वाई 16 मिमी., भुईंज 28 मिमी., ओझर्डे 17 मिमी., सुरूर 8 मिमी. अशी तालुक्यात सरासरी 16.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात वेगाने वारे वाहत असून प्रचंड पाऊस पडत असल्याने वारा व पावसाने तालुक्यातील पठारावर असलेल्या बालेघर-अनपटवाडी येथे विद्युत मंडळाचे लोखंडी व सिमेंटचे 3 खांब जमीनदोस्त झाले. तर अनपटवाडी स्मशानभूमीजवळ सिमेंटचा विजेचा खांब तुटल्याने विजेच्या तारा रस्त्यावर पडल्या आहेत.
पश्चिम भागातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणार्या कोंढावळे येथील पहिली ते सातवी पर्यंत असणार्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीचे पत्र्याचे छप्पर उडून गेले. किकली येथील दोन घरांचे पत्रे उडून गेले. भिवडी येथील एका घराची भिंत कोसळली आहे. जांब येथे दोन विजेच्या खांबांवर झाड पडून खांब तुटले आहेत. मुगाव येथील घरावरील पत्रे उडाले आहेत.
दसवडी येथे विजेच्या खांबांवर झाड पडून लोखंडी पोल वाकले आहेत. वेळे येथे 5 खांब तर वहागाव येथे 2 खांबांवर झाडे पडून नुकसान झाले आहे. ओझर्डे-कदमवाडी येथे वाई-वाठार रस्त्यावर करंजाचे झाड लाईटच्या खांबांवर कोसळल्यने लोखंडी पोल वाकून तारा तुटल्याने रात्रभर सात हजार लोकवस्तीचे गाव अंधारात होते. तर येथील पाणी पुरवठाही विजेअभावी बंद राहिला.
केंजळ येथे मुसळधार पावसाने आंबा व नारळ या पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. बावधन येथे दोन विजेंचे खांबांवर झाडे पडून लोखंडी पोल वाकल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. गावातील दोन घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. अशा प्रचंड नुकसानीमुळे शासकीय व खाजगी असे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील गेली दोन दिवस होत असलेल्या पाऊस व वेगवान वार्यांनी झालेलया नुकसान ग्रस्त गावामधील पडझडीची माहिती तहलिसदार रणजीत भोसले यांनी घेवून ती जिल्हाधिकारी सातारा यांना माहितीसाठी पाठविली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात आधीच कोरोनामुळे सकंटात सर्वच गावे अडकली असताना मुसळधार पाऊस व सुसाट वार्यांनी उभे केलेले संकट यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून संपूर्ण तालुका लॉकडाऊनच्या विळख्यात अडकला आहे. नागरिकांपुढे दोन वेळची चूल पेटविण्याचा प्रश्न व विस्कटलेली आर्थिक घडी बसविण्याच्या विवंचनेत नागरिक असतानाच निसर्गाच्या या कोपामुळे दुहेरी कोंडी झाली आहे.
अनेक शेतकर्यांच्या शेतपिकांच्या नुकसानीबरोबरच काहींच्या घरांच्या भिंती व पत्रे उडाल्याने हे कसे उभे करायचे या दुहेरी संकटात ते अडकले आहेत. तरी शासनाने नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थीक मदत करून दिलासा द्यावा अशी मागणी तालुक्यातील नागरिक करीत आहेत.
तालुक्यातील जांब, दसवडी, ओझर्डे-कदमवाडी, बालेघर-अनपटवाडी, बावधन, वेळे व वहागाव या गावांमधील सुमारे 17 विजेंचे खांबांवर झाडे कोसळून पडल्याने खांब निकामी झाले आहेत. तर काही ठिकाणी ते जमीनदोस्त झाले आहेत. यामुळे विज वितरण कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती वाई महावितरणचे कार्यकारी अभिंयंता कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता असलेले पंकज गोंजारी यांनी दिली.











