बारामती : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पिंपळी (ता. बारामती) येथे पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. पालखीचे विशेष आकर्षण ठरले ते काळुबाई मंदिर परिसरात शेतकरी-मेंढपाळांनी साकारलेल्या मेंढ्यांच्या भव्य गोलाकार रिंगणाचे. या अनोख्या स्वागताने वारकरी आणि भाविक मंत्रमुग्ध झाले.
बारामतीतील मुक्कामानंतर पिंपळीत दाखल झालेल्या पालखीचे स्वागत माजी सरपंच मंगल हरिभाऊ केसकर, माजी सरपंच स्वाती अशोक ढवाण आणि माजी उपसरपंच अश्विनी सुनिल बनसोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व औक्षण करून करण्यात आले. त्यानंतर काळुबाई मंदिराजवळ सतीश केसकर, तानाजी केसकर, जयवंत केसकर, यशवंत केसकर, अर्जुन केसकर, उत्तम केसकर, आप्पा केसकर, नवनाथ केसकर, बिनू केसकर आदी मेंढपाळांनी आपल्या मेंढ्यांच्या साहाय्याने पालखीभोवती भव्य रिंगण घालत पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.
पालखी सोहळा गावातील मारुती मंदिर परिसरात काही काळ विसावला. यावेळी संपूर्ण परिसर “ज्ञानोबा- तुकोबा”च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. ग्रामस्थ, महिला, युवक आणि वारकरी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने पालखीचे दर्शन घेतले. वारकऱ्यांसाठी ग्रामस्थांनी त्यांच्या पसंतीनुसार पिठलं-भाकरी, भात, लोणचे आणि पापड असा पारंपरिक भोजनाचा बेत ठेवला होता. भोजनानंतर पालखी सोहळ्याचे प्रमुख चोपदार महाराज यांच्यासह मान्यवरांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
त्यानंतर पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने पुढील प्रवासासाठी रवाना झाला. निरोप देताना अनेक भाविकांच्या डोळ्यांत भक्तिभावाने अश्रू दाटले होते.
यावेळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला, युवक तसेच वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिंपळी ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे पालखी सोहळ्याला भक्ती, परंपरा आणि सामाजिक ऐक्याची सुंदर जोड लाभली.











