शरद पवार समजून घेताना -२
थोडे मागे वळून पाहिले तर तो काळ होता सन १८६५- ६६ च्या सुमाराचा…कोरड्या व ओसाड जमीनी, खडकाळ भूप्रदेश, अगदीच तुटपुंजा पाऊस, पाण्याच्या स्त्रोताची दुर्मिळता, सह्याद्रीच्या पर्वतरांगांनंतरचा हा होता एक पर्जनछायेखालचा प्रदेश! पर्जन्यछायेखालचा प्रदेश मानला जात असला तरी सह्याद्रीच्या डोंगररांगांवरून येणारे ढग भरून तर यायचे, पण फक्त यायचे आणि जायचे..पाण्याची आस मात्र लावून जायचे, बरसायचेच नाहीत. या स्थितीत मग माणसांची व जनावरांचीही आबाळ व्हायची. राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशाची व अगदी वाळवंटाच्या दाहकतेची आठवण करून देणारा हा प्रदेश होता, भिमथडी..!
सन १८७२ च्या काळातल्या या भिमथडी म्हणजेच आजच्या बारामती तालुक्याचे हे होते वास्तव.. आज बारामतीसह आजूबाजूचे तालुके समृध्दीच्या सहवासात आहेत आणि येथील शेतकऱ्यांच्या घराच्या ओट्यापर्यंत समृध्दीचा मृदगंध पसरला असला तरी ही सुफळ संपूर्ण विकासाची कहाणी तितकीच कष्टाची आहे आणि बुध्दीवंतांनी गाळलेल्या घामाचीही!
सन १८७६ ते ८७ च्या काळात प्रचंड दुष्काळी स्थिती होती आणि भारतावर होते ब्रिटीशांचे राज्य! भिमथडीतल्या लोकांमध्ये दुष्काळामुळे निर्माण झालेल्या टंचाईमुळे प्रचंड असंतोष होता. हा असंतोष शमविण्यासाठी ब्रिटीशांनी निरा डाव्या कालव्याचे खोदकाम केले. काम पूर्ण झाल्यानंतर धरणही बांधले. साहजिकच या कालव्यामुळे अगदीच तीव्र अवर्षण प्रवण असलेल्या बारामती तालुक्यातील २२ गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला. त्या सर्व गावांतील शेती समृध्द झाली. २२ गावे बागायती बनली. त्य़ा गावांमध्ये अगदीच नगदी नसली तरी बऱ्यापैकी उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल अशी बागायती पिके घेतली जाऊ लागली. २२ गावांचा प्रश्न सुटला तरी बारामती तालुक्यातील उर्वरित गावांमधील जमीनी व एकूणच गावांचे अस्तित्व हे उंचवट्याच्या भागात असल्याने प्रवाही कालव्याचे पाणी काही या जमीनीपर्यंत पोचलेच नाही. साहजिकच तालुक्यातील दोन तृतीयाश शेती ही बेभरवशी बनली. वर्षाकाठी बरसणाऱ्या पावसाळ्यात अगदीच कमाल दहा ते बारा इंचाएवढा पाऊस आणि त्यावरच अवलंबून राहावे लागत असल्याने हा भाग दारिद्र्याच्या खाईत तसाच खितपत पडला होता. साहजिकच या काळात बारामती तालु्क्याचे समृध्दी व दारिद्र्य असे दोन परस्परविरोधी भाग पडले.











