मागण्या मान्य न झाल्यास संघर्ष तीव्र करण्याचा इशारा
पुणे : MPSC पेपरफुटीप्रकरणी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा, तसेच त्यांच्या पदावर स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, यासह विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या वतीने सोमवारी (दि. ७ सप्टेंबर) पुण्यात विराट आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात आमदार रोहित पवार सहभागी होणार आहेत.
पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर चौकापासून (महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल) जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सकाळी १० वाजता हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमधून सांगितले आहे. ‘विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ हा मोर्चा असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांशी संवाद साधताना या आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचा शब्द आपण दिला असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. मोर्चाला परवानगी मिळावी यासाठी त्यांनी पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त ऋषिकेश रावले आणि मिलिंद मोहिते यांची भेट घेऊन विनंती केली. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, सुनील माने, प्रमोद पाटील यांच्यासह विविध क्लासेसचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
‘सरकारला दोन दिवसांचा वेळ’
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आपण कालही त्यांच्यासोबत होतो, आजही आहोत आणि यापुढेही कायम राहणार असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. सरकारकडे दोन दिवसांचा वेळ असून, या कालावधीत MPSC अध्यक्षांना हटवून विद्यार्थ्यांच्या इतर मागण्याही मान्य कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मागण्या मान्य न झाल्यास संघर्ष अटळ असून, आगामी काळात आंदोलनाची व्याप्ती वाढवून विद्यार्थी आणि शिक्षकांची ताकद सरकारला दाखवून देऊ, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे. पेपरफुटीच्या घटनांमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील या मोर्चाकडे आता लक्ष लागले आहे.











