इंदापूर : महान्यूज लाईव्ह
नीरा डावा कालव्याची रखडलेली पाणीपाळी तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी पाणीवाटपात पश्चिम भागावर अन्याय होत असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. दरम्यान, पाटबंधारे विभागाने ३ सप्टेंबर रोजी कालव्याला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले.
पश्चिम भागातील नीरा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील मका, कडवळ, भुसार, चारा तसेच ऊस पिकांना सध्या पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, कालव्याची पाणीपाळी तीन महिन्यांहून अधिक काळ रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे संघटनेने सांगितले. त्यातच पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जमिनीतील ओलावा घटला असून हुमणीच्या प्रादुर्भावामुळे पिकांवर अतिरिक्त संकट निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला.
पाणीवाटपातील असमानतेचा आरोप..
इंदापूर तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम भागातील पाणीवाटपाच्या स्थितीवरूनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रश्न उपस्थित केला. पूर्व भागात तुलनेने मुबलक पाणी उपलब्ध होत असल्याने तेथील बागायती क्षेत्र वाढत आहे, तर पश्चिम भागातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी वारंवार आंदोलन करावे लागत असल्याचा आरोप संघटनेने केला.
पूर्व भागातील काही शेतांमध्ये पाणी साचून शेवाळ निर्माण होत असल्याचे चित्र असताना पश्चिम भागातील पिकांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले. पाणीवाटपात अशी तफावत का निर्माण होते, याबाबत पाटबंधारे विभागाने स्पष्टता द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
पाणीवाटपावर राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोपही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
पोलिसांच्या मध्यस्थीनंतर चर्चा..
पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकरी आणि संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र आल्यानंतर आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर झालेल्या चर्चेत ३ सप्टेंबर रोजी नीरा डावा कालव्याला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. या आश्वासनानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले. मात्र, ३ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष कालव्यात पाणी सोडण्यात आले नाही, तर पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम, इंदापूर तालुक्याचे माजी सभापती करणसिंह घोलप, उद्धटचे सरपंच रवी यादव, पवारवाडीचे सरपंच बबन वाबळे, सरपंच सतीश थोरात, आप्पा चव्हाण, तालुकाध्यक्ष आबासाहेब झगडे, अनिल काळभोर, दादा थोरात, रंजीत गाडगे यांच्यासह शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.










