दौंड : महान्युज लाईव्ह
यवत पोलीस स्टेशन अंतर्गत पाटस पोलीस चौकीच्या हद्दीत ठिकठिकाणी तब्बल १५ ते १८ अवैध हातभट्टी दारू चे अड्डे असुन खुलेआम लोकवस्तीत हे व्यवसाय सुरू आहेत. हे अवैध व्यवसाय तात्काळ बंद करून संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली असून यासंदर्भात यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
मागील काही वर्षांपासून पाटस गावच्या हद्दीत डोंगरेश्वर नगर, (तामखडा) भानोबा नगर, अंबिका नगर, पाटस रेल्वे स्टेशन, दत्तनगर , मधुकर नगर तसेच सिमेंट कंपनी परिसर तसेच इतर काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध हातभट्टी दारूचे व्यवसाय सुरू आहेत . तर काही ठिकाणी हातभट्टी गावठी दारू तयार करण्याच्या भट्टी आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत आहेत. या बेकायदेशीर धंद्यांमुळे अनेक युवक व्यसनाधीन होत असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक स्तरावर गंभीर परिणाम होत आहेत.”
“राज्यात नुकत्याच घडलेल्या विषारी हातभट्टी दारू प्रकरणात अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाटस परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायांकडे दौंड राज्य उत्पादन शुल्क विभाग व यवत पोलीसांनी गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मात्र या प्रकाराकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
पोलीसांनी संबंधित ठिकाणी तात्काळ धाडी टाकून संबंधित अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या व्यवसायांना संरक्षण देणारे अथवा कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी यांच्यावर ही कठोर कारवाई करण्यात यावी.” अशी मागणी संभाजी ब्रिगेडने निवेदनात केली आहे.
पुढील आठ दिवसांच्या आत ठोस कारवाई न झाल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने पाटस परिसरातील ग्रामस्थ, युवक व महिला भगिनींना सोबत घेऊन यवत पोलीस स्टेशनसमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच आवश्यकतेनुसार रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला.
याप्रसंगी शिवाजी साळुंके, मिथुन चव्हाण, इमरान खान, शंकर पवार, सोनबा देशमुख तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान याप्रकरणी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अविनाश मोहिते म्हणाले, अवैध हातभट्टी दारू व्यवसायांमुळे परिसरातील तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तातडीने व्यापक मोहीम राबवून अशा सर्व अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी बंदोबस्त करावा.










