दौलतराव पिसाळ, वाई
वाई-सातारा मार्गावरील वाकेश्वर-बावधन हद्दीत पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात वाई पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण (डीबी) विभागात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष व धाडसी पोलीस कॉन्स्टेबल श्रावण राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत हा दुर्दैवी अपघात घडल्याने पोलीस दलासह संपूर्ण वाई तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल श्रावण राठोड हे आपल्या पत्नीसह वाई-पाचवड मार्गावरून प्रवास करत होते. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की, राठोड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
श्रावण राठोड हे वाई पोलीस ठाण्यातील डीबी विभागात कार्यरत होते. गुन्हे उघडकीस आणण्यात त्यांची विशेष कामगिरी होती. कर्तव्यनिष्ठ, धाडसी आणि नागरिकांशी आत्मीयतेने वागणारे पोलीस कर्मचारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाची बातमी समजताच वाई पोलीस ठाण्यासह सातारा जिल्हा पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात आली. सहकारी अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
दरम्यान, अपघात घडवून अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संबंधित वाहनाचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कर्तव्य बजावत असताना अनेक गुन्ह्यांचा तपास लावणारे आणि पोलीस दलाचा आधारस्तंभ मानले जाणारे श्रावण राठोड यांच्या अकाली निधनामुळे पोलीस दलाने एक धाडसी व समर्पित सहकारी गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
हा खरंच योगायोगाने झालेला अपघात की जाणीवपूर्वक घातपात?
दरम्यान वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रावण राठोड यांच्या अपघातानंतर लोकांमध्ये शंकेची पाल चुकचुकली आहे. श्रावण राठोड हे कर्तव्यदक्ष आणि धडाकेबाज पोलीस कर्मचारी होते. अनेक गंभीर आणि गहन गुन्ह्यांचा त्यांनी अत्यंत कौशल्याने तपास करताना महत्त्वाची भूमिका बजावली. या गुन्हेगारीची उकल करताना नेहमीच अनेकांचा रोषही त्यांनी पत्करला. कर्तव्य भावना श्रेष्ठ म्हणून त्यांनी प्रत्येक वेळी कामाला महत्व दिले. साहजिकच त्यांचे हितशत्रू देखील मोठ्या प्रमाणावर होते.. आज झालेल्या अपघातामुळे या हितशत्रूंनीच हा प्रकार केला असावा का असा देखील संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस दलाने या दृष्टीने देखील तपास करावा अशी मागणी नागरिकांची आहे.











