राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
पुणे ग्रामीण पोलीस दलातील नुकत्याच झालेल्या मोठ्या बदल्यांमध्ये यवत पोलीस ठाण्याच्या नेतृत्वात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून विविध वाद, गंभीर घटना आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांमुळे चर्चेत राहिलेल्या यवत पोलीस ठाण्याला आता नवे कारभारी मिळाले असून, या बदलामुळे पोलीस कर्मचाऱ्यांबरोबरच परिसरातील नागरिकांमध्येही विविध चर्चांना उधाण आले आहे.
यवत पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गेल्या काही काळात अनेक संवेदनशील घटना घडल्या. त्यामध्ये सांप्रदायिक तणाव निर्माण होऊन दंगलसदृश परिस्थिती उद्भवणे, एका पोलीस कर्मचाऱ्याने सुसाईड नोट लिहून बेपत्ता होण्याचा प्रकार, तसेच वाढती गुन्हेगारी यामुळे पोलीस प्रशासनावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. विशेषतः एका पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रकरणानंतर पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर विविध स्तरांतून टीका झाली होती. या घटनेनंतर पोलीस दलातील वातावरण, वरिष्ठांशी असलेले संबंध आणि अंतर्गत व्यवस्थापन याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. काही संघटनांनी आणि नागरिकांनी संबंधित प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे, जुगार अड्डे, अवैध मद्यविक्री तसेच महामार्गालगत सुरू असलेल्या बेकायदेशीर कारवायांबाबत वारंवार तक्रारी होत होत्या. यासंदर्भातील काही तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंतही पोहोचल्याची चर्चा होती. त्यामुळे स्थानिक पातळीवर पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत होते.
याच पार्श्वभूमीवर ५ जून रोजी पाटस परिसरात भरदिवसा दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण दौंड तालुका हादरला. सिमेंट वाहतूक ठेक्याच्या वादातून झालेल्या या गँगवॉरमुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. या घटनेनंतर वरिष्ठ पातळीवरून परिस्थितीचा आढावा घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या आदेशानुसार झालेल्या बदल्यांमध्ये यवत पोलीस ठाण्याच्या प्रमुख पदावरही बदल करण्यात आला. आता या ठिकाणी संतोष वसंत तासगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील अनुभव असलेले तासगावकर हे शिस्तप्रिय आणि कडक अधिकारी म्हणून ओळखले जातात.
आता नवीन नेतृत्वासमोर यवत-पाटस परिसरातील वाढती गुंडगिरी, गँगवॉर, अवैध धंद्यांवर नियंत्रण आणि नागरिकांमध्ये पोलीस यंत्रणेवरील विश्वास पुनर्स्थापित करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. गेल्या काही महिन्यांत निर्माण झालेली नकारात्मक प्रतिमा बदलून कायदा-सुव्यवस्थेला बळकटी देण्याची अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. नेतृत्वबदलानंतर पोलीस ठाण्याच्या कारभारात नेमका किती फरक पडतो आणि परिसरातील गुन्हेगारीवर कितपत प्रभावी नियंत्रण मिळवले जाते, याकडे आता यवत-पाटस परिसरासह संपूर्ण दौंड तालुक्याचे लक्ष लागले आहे.











