पुणे : महान्यूज लाईव्ह
अलीकडे दवाखान्यापुढे आणि शाळा पुढे सारेच शरणागत अशी परिस्थिती आहे. दवाखान्यात आणि शाळेत पायरी चढली की तिथे माणूस शूद्र बनतो. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणाचा अनुभव थेट आमदारालाच आला म्हणून बरे, गेल्या अनेक वर्षांपासून लोक येथील रुग्णालयाच्या एकूण वागणुकी संदर्भात तक्रारी करतात मात्र रुग्णालयाचा रुबाब मोठा असतो.. आता आमदाराच्या स्वीय सहाय्यकाची पत्नी केवळ पैशाच्या मागणीमुळे उपचार न केल्याने मरण पावली. त्यानंतर मात्र आता दवाखान्यांचा हा मुजोरीपणा समोर आला आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलगर्जीपणा झाला म्हणूनच तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याची तक्रार खुद्द भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी करत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा गलथान कारभार चव्हाट्यावर आणला. त्यावर रुग्णालयाने स्पष्टीकरण देत ही आमची बदनामी असून संपूर्ण माहिती एकांगी पणे सांगितली जात आहे आम्ही आमचा अहवाल सरकारला सादर करू असे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे मात्र पुणे जिल्ह्यात या रुग्णालयाविषयी काय चर्चा सामान्य लोकांमध्ये आहे ती वेगळी सांगायला नको.
घडले असे की, आमदार गोरखे यांनीच प्रसारमाध्यमांना माहिती दिली. ही माहिती अशी, आमदार गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे आहेत त्यांच्या पत्नी मोनाली भिसे यांना प्रसूतीसाठी दीनानाथ मंगेशकर दवाखान्यात नेण्यात आले होते हॉस्पिटलच्या प्रशासनाने दहा लाख रुपये भरण्याची सूचना केली त्यावर भिसे कुटुंबीयांनी तीन लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली. मात्र रुग्णालयाने या सर्व प्रक्रियेला कदाचित 20 लाख रुपये लागू शकतात अशावेळी तीन लाख रुपयांचे काय करायचे असा मुद्दा पुढे मांडला आणि उपचार करण्यास नकार दिला. यानंतर मंत्रालयातून देखील दवाखान्याच्या प्रशासनाला फोन गेले. तीन लाख रुपये घेऊन उपचार सुरू करा असे सांगूनही फरक काहीच पडला नाही.
अखेर दुसऱ्या रुग्णालयात तनिषा यांना दाखल करण्यात आले. त्यांना जुळी मुले झाली. अतिरक्तस्त्रामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून पुण्यातही संताप व्यक्त केला जात असून खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यावर टीकेची झोड उठवली आहे.
सुप्रिया सुळे यांनी पैशाअभावी अद्ययावत सुविधा असूनही उपचार नाकारले जात असतील तर त्या अतिशय गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त केले आहे. अगदी मंत्रालयातून फोन गेल्यानंतर देखील त्या महिलेला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. काही तास रुग्णालयाच्या दारात वेदनेने विव्हळत असलेल्या या महिलेचा मानवतेच्या भूमिकेतून देखील रुग्णालय प्रशासनाने विचार केला नाही. मंत्रालयातून विनंती करूनही जर रुग्णालय ऐकत नसेल, तर सर्वसामान्य जनतेचे काय? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.











