मुंबई : महान्यूज लाईव्ह
दिशा सालीयन आत्महत्येचा पुन्हा नवीन अंक आता समोर आला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात दिशा सालीन आत्महत्येचे प्रकरण विरोधकांनी लावून धरले होते. यामध्ये शिवसेनेचे युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले होते. कालांतराने हे प्रकरण बासनात गुंडाळले गेले. आता दिशा साले यांचे भूत पुन्हा उकरले आहे, ते तिच्याच वडिलांनी! आणि यात एनसीबीचा वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे यांच्यामार्फत तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
दिशा सालीयनचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल करून दिशा सालियान हिच्या प्रकरणाचा तपास आयपीएस अधिकारी समीर वानखेडे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या अंतर्गत करावा व दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे, त्याची एनआयए मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवले व त्यांनी सादर केलेले पुरावे खरे मानायला भाग पाडले असा आरोप याचिकेत सतीश सालियान यांनी केला असून आदित्य ठाकरे, सुरज पांचोली, दिनो मोरिया आणि मुंबई पोलिसांवर या याचिकेमध्ये गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसेच नितेश राणे व पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी दिशाच्या मृत्यूबाबत जे आरोप केले होते, त्यामध्ये तथ्य असल्याचा दावा याचिकेत दिशाच्या वडिलांनी केला आहे.
आठ जून 2020 रोजी मालाडच्या एका इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरुन दिशाचा पडून मृत्यू झाला होता. दिशा ही सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर होती. त्यावेळी त्या घटनेचा मुंबई पोलिसांनी केलेला तपास दिशाच्या आई-वडिलांनाही मान्य होता. त्यांनी या तपासाबाबत समाधान व्यक्त केले होते. आणि त्यातील महत्त्वाची गंमत म्हणजे त्यावेळी नितेश राणे यांनी दिशा हिच्यावर गॅंगरेप झाला होता आणि त्यातूनच तिची हत्या करण्यात आली असा आरोप केल्यानंतर याच दिशाच्या आई-वडिलांनी त्यावेळी नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
आता नेमकी उलट भूमिका दिशाच्या वडिलांनी घेतली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण पुन्हा नव्याने शिजू लागले आहे. अर्थात वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे यांच्यामार्फतच हा तपास का? याचे मात्र मुंबईतही अनेकांना कोडे पडले आहे.











