डॉ. संदेश शहा, इंदापूर
बाभूळगाव ( ता. इंदापूर ) येथील दिपक गुरगुडे या शेतकऱ्याने सलग चार वर्ष डाळिंब परदेशात निर्यात करून भरघोस उत्पादन घेतले. त्याची दखल घेत भारत सरकारने ७५ व्या प्रजासत्ताकदिनी दिपक गुरगुडे यांना दिल्ली येथे विशेष निमंत्रित म्हणून बोलवून त्यांचा सपत्नीक सन्मान केला.
काळया आईची प्रामाणिक सेवा केल्यास शेतकऱ्यांना निश्चित आशीर्वाद मिळतो. तो खरोखर अन्नदाता बळीराजा होतो याचा प्रत्यय बाभूळगाव ( ता. इंदापूर ) येथील प्रयोग व प्रगतीशील शेतकरी दिपक गुरगुडे यांच्या फायद्याच्या डाळिंब शेतीमुळे येतो. एकदा नव्हे तर सलग चार वर्ष या शेतकऱ्याचे डाळिंब परदेशात दुबई, बांगलादेश, मलेशिया तसेच देशांतर्गत बिग बास्केट मार्फत विकले गेले.
सलग चार वर्ष डाळिंब परदेशात निर्यात करून भरघोस उत्पादन घेतल्याने याची दखल घेत भारत सरकारने देखील ७५ व्या प्रजासत्ताक दिनी दिपक गुरगुडे यांना दिल्ली येथे विशेष निमंत्रित म्हणून बोलवून त्याचा सपत्नीक सन्मान केला. शेती परवडत नाही असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांसमोर दिपक याने फायद्याच्या शेतीचा आदर्श ठेवला आहे.
इंदापूर तालुक्याच्या पूर्व भागात उजनी धरणाच्या अलीकडे बाभूळगाव ( ता. इंदापूर ) येथील दिपक आबासाहेब गुरगुडे व प्रदिप आबासाहेब गुरगुडे या सुशिक्षित शेतकऱ्यांचे भगव्या जातीचे डाळिंब सलग चार वर्ष परदेशात बांगला देश येथे निर्यात होत आहे. दुबई, मलेशिया या देशात देखील त्याचे डाळिंब गेले आहे. इंदापूर तालुक्यात तेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकऱ्यांनी डाळिंब बागा काढल्या असताना दिपक गुरगुडे यांना फळपिकातून खर्च वजा जाता आतापर्यंत कोट्यावधी रुपयांचा फायदा झाला आहे.
दिपक व प्रदिप यांचे आई, वडील हे शेतकरी आहेत. त्यांना दोन्ही मुलांनी शिकून नोकरी करून साहेब व्हावे असे वाटायचे. त्यामुळे त्यांनी दीपक यास एमएबीपीएड तर प्रदिप यास बीए पर्यंत शिकवले. मात्र दोघांनी नोकरीची अपेक्षा न ठेवता काळ्या आईची सेवा करण्याचे उत्तम व्रत सांभाळत उत्तम तसेच आदर्श शेती व्यवसाय असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. संपूर्ण गुरगुडे कुटुंब शेतीत रमले आहे. सन २०२१ मध्ये खर्च वजा जाता त्यांना प्रथम ४९ लाख रुपयांचा नफा मिळाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
कोरोना महामारी, डाळिंबा वरील विविध आजाराच्या पार्श्वभूमीवर देखील त्यांच्या डाळिंबास चांगला दर मिळाल्याने त्यांनी आणखी सहा एकर भगवा डाळिंब केले असून त्यामध्ये ७५०० झेंडू लावून यशस्वी आंतरपीक घेतले आहे तर दोन एकर मध्ये जम्बो केशर जातीचा आंबा लावून त्याचे देखील ते उत्पन्न घेत आहेत.
सुरवातीस त्यांनी डाळिंब या फळपिकाचा पीक नियोजन आराखडा तयार करून साडे चार एकर क्षेत्रावर ९ बाय १४ फूट अंतरा वर १८०० डाळिंबाची रोपे लावली असून त्यांचे हे चौथे पीक आहे. त्यांचे ५५ टन डाळिंब झाले असून पैकी ४४ टन ए वन मालास १३१ रुपये प्रती किलो दर मिळून ती परदेशी रवाना झाली. त्यातून त्यांना ५७ लाख ६४ हजार रुपये तर त्यांच्या बी ग्रेडच्या ६ टन डाळिंबास ५४ रुपये प्रती किलो दर मिळून त्यांना ३ लाख २४ हजार रुपये मिळाले. त्यांचे ५ टन डाळिंब स्थानिक बाजारपेठेत हातोहात विकले गेले असून त्यांना एकूण ६० लाख ९७ हजार रुपये उत्पन्न झाले.
त्यांचा औषधे, बहर, शेणखत, रासायनिक व सेंद्रिय खत व जल व्यवस्थापनाचा खर्च ७ लाख तर मजूर खर्च ४ लाख असा एकूण ११ लाख ८५ हजार रुपये आला असून त्यांना खर्च वजा जाता ४९ लाख १३ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला. त्यांचा गाय, म्हैस व वासरे असे २५ जनावरांचा मुक्त गोठा असून मुरघास व मिल्किंग मशिनचा ते वापर करतात. त्यांचे प्रतिदिन १८० ते १९० लिटर दुध उत्पादन होत असून प्रती महिना सुमारे १ लाख ४० हजार रुपयांची उलाढाल आहे. खर्च वजा जाता त्यांना ४० ते ५० हजार रुपये त्यातून नफा होतो.
दिपक याने कर्नाल येथे शास्त्रोक्त दूध निर्मिती, कोईमतूर येथे ऊस पैदास केंद्रात प्रशिक्षण घेतले असून पंतप्रधान कौशल्य व उद्योजकता विकास योजने अंतर्गत इंदापूर व बाभूळगाव येथे प्रशिक्षण घेतले आहे. त्यास तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर, कृषी मंडळ अधिकारी आबासाहेब रूपनवर, नाना साळुंखे, ओंकार काळे, हनुमंत बोडके, संजय लोणकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. शास्त्रोक्त तंत्रज्ञान, जिद्द, आत्मविश्वास तसेच प्रामाणिक कष्ट हेच खरे भांडवल असून या जोरावर शेती व्यवसायात यशस्वी झाल्याचे दीपक गुरगुडे यांचे म्हणणे आहे.
मागील वर्षी पाच एकर मध्ये एक कोटी २३ लाख रुपयांचे उत्पन्न निघाले. एकूण ७१ टन माल निघाला आहे. त्यातील ६५ टन डाळिंब हे १८० रुपये किलो प्रमाणे बांगलादेशला निर्यात झाले तर सात टन डाळिंब शंभर रुपये प्रमाणे स्थानिक बाजारपेठेत विकले गेले. यावर्षी त्यांना तेरा लाख रुपये खर्च आला असून खर्च वजा जाता एक कोटी दहा लाख रुपये निव्वळ नफा मिळाला आहे. यंदा एका एकर मध्ये साडेचौदा टन डाळिंब व्यापाऱ्याला विकले असून त्यांना प्रती किलोचा दर १९५ रुपये प्रमाणे १०० ग्रॅम पासून पुढे मिळाला आहे.
एका एकर मध्ये १४५०० किलो एवढे उत्पन्न मिळाले असून त्याचे त्यांना २८ लाख २७ हजार ५०० रुपये मिळाले आहेत. त्यामध्ये खर्च दोन लाख रुपये एवढा झाला असून उर्वरित सर्व नफा आहे. बांगलादेश, मलेशिया व दुबई त्याचप्रमाणे बिग बास्केट येथे त्यांचे डाळिंब विकले गेले आहे. त्यांना एकूण ११ एकर मध्ये अडीच कोटी रुपयांचे विक्रमी उत्पादन मिळाले आहे.
त्यांना इंदापूर तालुका पत्रकार संघ, तसेच दौंड कृषी महोत्सव २०२३ मध्ये भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व फतेपुर सिक्रीचे खासदार राजकुमार चहर, वासुदेव काळे, राम शिंदे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय कृषि भूषण पुरस्कार, त्याच प्रमाणे शिर्डी येथे कृषिरत्न पुरस्कार, राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या हस्ते कृषिरत्न पुरस्कार, इंदापूर बाजार समिती मध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उत्कृष्ट निर्यातक्षम डाळिंब पुरस्कार मिळाला आहे.
पुणे कृषी विभागाचे उप आयुक्त दत्तात्रय गवसणे, बारामती उपविभागीय कृषी अधिकारी एस. डी. चौधरी, बारामती तालुका कृषी अधिकारी बी. एस. रूपनवर, इंदापूर चे तहसीलदार जीवन बनसोडे, नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे यांच्या सहित अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीची पाहणी करून त्यांचे कौतुक केले आहे. उच्च शिक्षित असून देखील त्यांनी नोकरीच्या मागे न लागता शेतात जे पिकते, त्याऐवजी बाजारपेठेत जे विकते ते दर्जेदार निर्यातक्षम पिकवण्यावर त्यांनी भर दिला आहे. त्यांचा आदर्श शेती व्यवसाय करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आदर्श उदाहरण आहे.











