सध्या धार्मिक स्थळावरील बऱ्याचशा नियमांना नव्याने बदलले जात असून, मध्य प्रदेशात तर एक अधिसूचना सरकारने जारी केली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शहरी आणि ग्रामीण भागातील राज्यातील महत्त्वाच्या 13 धार्मिक स्थळांच्या परिसरातील दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या एक एप्रिल पासून अशा ठिकाणी दारू विक्री अजिबात होणार नाही. तसेच येथील दुकाने देखील इतरत्र स्थलांतरित केली जाणार नाहीत. त्यामुळे एकंदरीत ही दुकाने चालवणाऱ्या दुकानदारांचा परवाना पूर्णपणे निष्कासीत होणार आहे. त्याचा विचार करता संपूर्ण देशभरात येत्या काळात अशा स्वरूपाची नवीन नियम प्रणाली लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात महायुतीचे राक्षसी बहुमत असल्याने महाराष्ट्रातील तीर्थस्थळांच्या ठिकाणी देखील सध्या सुरू असलेली वाईन, बार, देशी विदेशी दारू विक्री दुकाने बंद होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
मध्य प्रदेशातील उज्जैन शहरासह ओंकारेश्वर, महेश्वर, मंडलेश्वर, ओरछा, मैहर, पन्ना, चित्रकूट, दतिया, मंडला, मुलताई, अमरकंटक, बर्मन, कुंडलपूर, लिंगा, बंदूकपुर, सालकनपुर, मंदसौर या नगरपालिका, महानगरपालिका व नगरपंचायतीसह ग्रामपंचायतींच्या हद्दीत येत्या एक एप्रिल पासून दारूची दुकाने सुरू राहणार नाहीत.
विशेष म्हणजे येथील दारूच्या दुकानांना इतरत्र कुठेही स्थलांतरित होण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही. बार आणि वाईनच्या आउटलेट चे नवीन परवाने देखील या ठिकाणी दिले जाणार नाहीत. ही पवित्र ठिकाणे आहेत आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दारू विकली जाणार नाही अशा स्वरूपाचा अध्यादेश राजभवनाने जारी केला आहे. मध्य प्रदेशातील निर्णय इतरही राज्यांत लागू झाला, तर नवल वाटण्याचे कारण नाही. अर्थात दारू विक्री हा त्या त्या राज्यातील अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने हा कणा किती सरकारी मोडतात यावर इतर राज्यातील या निर्णयाचा अंमल अवलंबून असणार आहे.











