दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : सातारच्या क्रांतीसिंह नाना पाटील या शासकीय रुग्णालयातील एम आर आय मशीन अकोल्याला पळवलीच कशी ? असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे . सातारा जिल्ह्यात एक उपमुख्यमंत्री, चार मंत्री, एक कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष असा “भोंग्या”चा गजबजाट असताना अत्यवस्थ रूग्णांच्या औषधोपचारात वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिशा दाखवणारे “एमआरआय” स्कॅन मशीन “अकोल्याला” पळवल्याची दबक्या आवाजातल्या चर्चा आता वाढली आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी प्रयत्न केला असता अधिकारी मात्र “हातची घडी तोंडावर बोट” अशा भूमिकेत आहेत.
सातारा, रायगड, रत्नागिरी या तीन जिल्ह्यातील एमआरआय स्कॅन मशीन नागपूर, पालघर, अकोला रूग्णालयात बसवण्याचे आदेश मंत्रालयातून देण्यात आले आहेत. पण नाव मोठं अन् लक्षणं खोटं अशी सातारच्या शासकीय रुग्णालयाची अवस्था आहे. विविध संकटांना, अडचणींवर मात करीत रुग्णालयाची वाटचाल सुरू आहे. चिट्टी मुक्त दवाखाना ही शासनाची घोषणा म्हणजे आई जेवू घालेना, अन् बाप भिक मागू देईना अशी अवस्था आहे.
शासन झटपट गुणकारी मात्रा असलेली औषधे पुरवठा करत नाही. रूग्णांना लवकर आजारमुक्ती मिळावी यासाठी बाहेरून खरेदी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी चिट्टी देत नाहीत. नातेवाईकांच्या आग्रहाखातर चुकून औषधांची चिठ्ठी दिली आणि कागाळी वरिष्ठांपर्यंत गेली तर रोषाबरोबर कारवाईला सामोरे जावे लागते अशा दुहेरी कात्रीत वैद्यकीय अधिकारी अडकतात. परिणामी दोन चार दिवसात बरा होणारा रूग्ण आठवडाभराचा मुक्काम शासकीय रुग्णालयात ठोकतो.
रूग्णालयाचा आणि रूग्णांच्या आजारात महत्त्वाचा दुवा म्हणजे हृदयरोग तज्ज्ञ असतात. त्यांची भूमिका वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाची असते. हृदयरोग चिकित्सा, रूग्णांच्या कोणत्याही शस्त्रक्रिया, वृध्दापकाळातले आजार, रक्तदाब, अपघातातले अत्त्यावस्थ रूग्णांसाठी हृदय रोग तज्ञांची भूमिका महत्त्वाची असते. गेली दहा बारा वर्षे सातारच्या क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात अधिकाऱ्यांची “वाणवा” आहे. मात्र नेते मंडळी तितक्याशा गांभीर्याने बघतात असं वाटत नाही.
सद्यस्थितीत अस्थिरोग तज्ज्ञ, दंत चिकित्सक, नेत्रतज्ज्ञ, नाक, कान, घसा तज्ञ, सर्जरी तज्ञ अशा विविध विभागात आठरा ते वीस वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे. या गोष्टींचा परिणाम वैद्यकीय सेवेवर होतो. परिचारिका, लिपीक, शिपाई यांच्या कमतरतेमुळे तारेवरची कसरत वरिष्ठ अधिकाऱ्यांना करावे लागते. अपुरी यंत्रसामुग्री, जेमतेम औषध पुरवठा, दिवसेंदिवस वाढती रुग्ण संख्यामुळे रूग्णालयीन प्रशासन मेटाकुटीला येताना दिसत आहे .
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग सातारा जिल्ह्यातून जातो. या महामार्गावर गेल्या पंधरा वीस वर्षात हजारो अपघात झाले. हजारो जण जायबंदी झाले. अशा अपघातात सापडलेल्या रुग्णांच्या अतितातडीच्या उपचारासाठी सिटीस्कॅन एमआरआय मशीन अत्यंत गरजेची असते. तातडीने व अचूक निदान झाले तर वेळेत उपचार करता येतो यासाठीच अशा मशीनची आवश्यकता असते मात्र केवळ एमआरआय साठी रुग्णांना बाहेर न्यावे लागते त्यासाठी अगदी पाच हजारापासून दहा हजारापर्यंत खर्च होतो.
सातारच्या शासकीय रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन मधल्या काळात कराडला हलवण्यात आली. सातारा ते कराड मशीन नेण्याचा घाट घातला गेला खरा, पण तिथं मशीन रूग्ण सेवेत रूजू होण्याऐवजी कराडला धूळ खात पडली होती. दुसरीकडे शासनाचा “माल” सगळाच “गोलमाल” अशी परिस्थिती सिटी स्कॅन मशीनची अवस्था आहे. कधी मशिनला “फेफरं” येईल हे सांगता येत नाही. सिटी स्कॅन मशीन अचानक “कोम्यात” गेली की, मशीन दुरूस्तीला लवकर तज्ञ “वैद्य” मिळत नाही. मशीनची शस्त्रक्रिया करायला “सर्जन” मिळाला तर स्पेअरपार्टस तातडीने उपलब्ध होत नसल्याने महिनो महिने सिटी स्कॅन बंद असते.
रूग्णालयाच्या उभारणी नंतर एमआरआय स्कॅन मशीन “पीपीपी” तत्वावर सातारच्या शासकीय रुग्णालयात रूग्ण सेवेत दाखल होणार होती. मे. युनिक वेलनेस प्रा. लि. या दिल्लीच्या कंपनीला २७ सप्टेंबर २०२२ रोजी कार्यालयीन आदेश दिले गेले. यासंदर्भातील करार २७ नोव्हेंबर २०२३ दिवशी राज्य शासनाने कंपनी बरोबर करार केला. एमआरआय स्कॅन मशीन शासकीय रुग्णालयात
दाखल होणार असल्याने रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी सुखावले होते.
तातडीने मशीनसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाचे आदेश आले. मशीन बसवण्यात येणार त्या जागेची निश्चिती करण्यात आली होती. मात्र रुग्णालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. राज्याच्या सत्तापरिवर्तनाच्या “लाटेत” जूने आदेश “गंगेला” मिळाल्याचेच जणू जाणवत आहे.
कारण नव्या सरकारच्या काळात नवा विटीदांडू चालवताना सातारच्या शासकीय रुग्णालयातील एम आर आय स्कॅन मशीन आता नवीन शासकीय रुग्णालय अकोला येथे, रायगड मधील मशीन नागपूरकडे तर रत्नागिरीचे मशीन पालघर कडे हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सातारा रायगड रत्नागिरी या ठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध नसण्याचे जुजबी कारण यामध्ये देण्यात आले.
इतर जिल्ह्यांचे माहित नाही, मात्र सातारा शासकीय रुग्णालयात जागा उपलब्ध होती, मात्र जागा उपलब्ध नसल्याचा अहवाल कोणाच्या राजकीय दबावातून वरिष्ठ कार्यालयात सादर झाला त्याचे गुढ काही उलगडत नाही. त्यामुळे समस्यांचे भूत सातारच्या रुग्णांच्या पाठीवरून काही उतरणार नाही.
क्रांतीकारकाच्या सातारा जिल्ह्यात स्वातंत्र्यानंतर प्रथमच अनेकांना मंत्रीपदांची लॉटरी लागली. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारचे सुपूत्र, स्पष्टवक्तेपणा जोपासणारे पालकमंत्री तथा पर्यटन विकास मंत्री शंभुराजे देसाई, भोंगा नाही आणि पोलीसांच्या फौजफाट्याविना जनमानसात बिनधास्त फिरणारे शिवरायांचे थेट वंशज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मितभाषी पण सर्वसामान्यात रमणारे, पुनर्वसन व मदत कार्य मंत्री तथा बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद पाटील, डॅशिंग, स्पष्टवक्ते ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर पालकमंत्री जयकुमार गोरे, कुणाचाही मुलाहिजा न ठेवणारे, मतदार संघात गावागावात सतत संपर्कात असणारे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय कराड दक्षिणचे अतुल भोसले, कराड उत्तरचे आ. मनोज घोरपडे अशी भक्कम राजकीय फळी जिल्ह्यात असतानाही मशीन जातेच कशी? यावरच सध्या चर्चा रंगली आहे.











