कोल्हापूर : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांच्या हत्या प्रकरणी तत्कालीन पोलीस अधीक्षक के.एम. एम. प्रसन्ना व अपर पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी चुकीच्या पद्धतीने पोलीस निरीक्षक संभाजी पाटलांना अटक केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
15 जानेवारी 2009 रोजी कराड तालुक्यातील मलकापूर येथे महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांचा खून झाला होता. या प्रकरणात तत्कालीन पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी आठ आरोपीविरुद्ध न्यायालयात दक्षारोप पत्र दाखल केले होते. त्यानंतर त्याचा तपास मुरलीधर मुळूक यांनी केला होता, मात्र या दरम्यानच्या काळात अधिक तपासाचा आदेश देत अप्पर पोलीस अधीक्षक अमोल तांबे व पोलीस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्न यांनी संभाजी पाटील यांना अटक केली होती.
या प्रकरणात सन 2013 मधील मार्च महिन्यात पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर कराडच्या न्यायालयाने पाटील यांना जामीन मंजूर केला, मात्र त्यानंतर 30 मार्च 2013 पासून संभाजी पाटील हे तत्कालीन पोलीस महासंचालकांकडे व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अर्ज करत होते. मात्र या संदर्भात कोणीच दाद दिली नाही म्हणून ते उच्च न्यायालयात गेले.
उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये संभाजी पाटील यांच्या वतीने करण्यात आलेली त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच पाटील यांना आठ आठवड्याच्या आत तत्कालीन पोलीस अधीक्षक के एम एम प्रसन्न व अप्पर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दंड व पाटील यांना नुकसान भरपाई म्हणून दोन लाख रुपये शासनाने द्यावेत असा आदेश दिला.











