मुनीर तांबोळी, बारामती ९८९०३६२९८६
एका बरणीत जर १०० काळ्या मुंग्या आणि १०० लाल मुंग्या ठेवल्या तर…. काहीही होणार नाही हे तुम्हाला माहीत आहे का..? पण जर कोणी ती बरणी जोरात हलवली, तर मुंग्या एकमेकांना मारायला लागतात. कारण लाल मुंग्या आता काळ्या मुंग्यांना शत्रू समजतात आणि काळ्या मुंग्या लाल मुंग्यांना शत्रू समजतात…!
परंतु खरा शत्रू तो आहे जो बरणी हलवतो! बरोबर ना? नेमकं मानवी वस्तीतही असच घडते. त्यामुळे एकमेकांवर हल्ला करण्याआधी बरणी कोण हलवतंय? याचा विचार सदसद्विवेकबुद्धीने नक्की करा. ज्या वेळस अपयशी राज्यकर्ते व राजकारणी जेव्हा हे आपल्या कर्तृत्वाने जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कमी पडतील. त्यांच्याकडे मुलभूत प्रश्नावर , जसे की वाढती महागाई, बेरोजगारी, महीला अत्याचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिक्षणाचे खाजगीकरण, सरकारी मालमत्तेचे खाजगीकरण, आरक्षण या सारख्या असंख्य प्रश्वावर बोलण्यासारखे काहीच उत्तर नसेल, तर ते त्यांचे पाळीव बगलबच्चे किंवा सुपारीबाज दलाल, पंटर यांच्या मार्फत सामाजिक एकतेची बरणी हलवतील.
कधीतरी समाजा-समाजात आरक्षणावरुन, नाहीतर कधी धर्म खतरेमे आहे, असं म्हणून ते बरणी हलवतील..बघा बरं.. पण ते कधी एकमेकांशी भांडायला मारामारी (दंगल) करायला भाग पाडतील हे सांगता येत नाही. नेहमी लक्षात ठेवा बरणी हलवणारा स्वतःचं नुकसान करून घेत नाही. त्याची बायका मुलं अतिशय सुरक्षित राहतात. समाजात काही का घडेना, मग त्याला त्याचं काहीच देणं घेणं नसतं.
अर्थात बरणी कोण हलवतंय किंवा हलवणार आहे, हे सध्या दिसतंय. त्यामुळे आपण आपल्या जीवन-मरणाच्या मुळ प्रश्नावरून काहीही झाले तरी भरकटायचे नाही. आपल्या न्याय सुविधांबाबत बोलत राहायचे. पण मूळ प्रश्नाला बगल मारू द्यायची नाही. कारण पुढील पिढी ही आपल्यापेक्षा सुशिक्षित आणि चिकित्सक, हुशार असणार आहे. ते आम्हाला विचारतील.. जेव्हा कारण नसताना उकरून समाजातील वाद निघाला, तेव्हा तुम्ही आमच्यासाठी काय केले?
पुढील पिढीला आपल्या उत्तर द्यायचे आहे. त्यामुळे आपल्या भविष्याशी निगडित मुलभूत प्रश्नावर लक्ष द्या. आपापसात सुसंवाद करा. विश्वास संपादन करा. द्वेषाला प्रेमाने जिंका. शेवटी माणूसच माणसाच्या कामाला उपयोगाला येतो, त्यासाठी सामाजिक ऐक्य प्रेम, बंधुत्व, भाईचारा, टिकवून ठेवा. आपल्या माणसांमध्ये सुसंवाद ठेवा, डोळे सुंदर असले की जग सुद्धा सुंदर दिसते. मनात प्रेम असेल तर जगात सुध्दा प्रेमच भेटतं. मानवतेवर प्रेम करा मानवाता, माणूसकीच जिंकेल हा विश्वास ठेवा.











