प्रा. धनंजय माने, बारामती
टीव्ही चॅनेल्स आणि मीडियाच्या बातम्या वाचून काल मन सुन्न झालं… मनात अनेक प्रश्नांचं काहूर उठायला लागलं. शिक्षण व्यवस्थेबद्दल समाज व्यवस्थेबद्दल अनेक प्रश्न मनात उभे ठाकले. एक पालक म्हणून आपल्या मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी, व त्याही पलीकडे या सगळ्या गोष्टींचा होणारा परिणाम यासारख्या प्रश्नांचे वादळ घोंगावत राहिले.
खून झालेल्या विद्यार्थ्याच्या आईने केलेला आक्रोश, किंकाळ्या व्यवस्थेला नक्की समजतील का? माणसांच्या संवेदना बोथट झाल्या की संवेदना संपून गेल्या असंच वाटायला लागलं. जीवन जगत असतानाचा हा नवा संघर्ष आज प्रत्येकाला भेडसावतोय. बारामती हे शिक्षणाचे,विद्येचे माहेरघर म्हणून आपण आज बघतो. नवनवीन बदल हे नेहमी पहिल्यांदा बारामतीत होताना पण बघतो.
एकीकडे तीन खासदार, एक उपमुख्यमंत्री एक आमदार अशी परिस्थिती असतानाही या सर्व गोष्टी सावरतील का? एखाद्या माणसाचा मृत्यू समोर डोळ्यासमोर दिसत असताना, त्याचा जीव वाचवण्यासाठी कित्येक गर्दीतल्या लोकांना आपण जावं व त्याला वाचवावं असं का वाटलं नाही? की व्हाट्सअप फेसबुक सारखी एखादी मीडियातील वाचत पहात असलेली घटना समोर घडते आहे व आपण फक्त स्क्रीन वरून बोटं फिरवतोय असं तर वाटलं नसेल?
लहानपणापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला आपला मुलगा अचानक त्याचा झालेला खून व ही कानावर पडलेली बातमी आई-वडिलांच्या मनाला कशी स्पर्शून किंवा चिरडून गेली असेल? असे अनेक प्रश्नांचे काहूर माझ्या मनात यायला लागले. काही ज्येष्ठ व्यक्तींच्या बद्दलच्या चर्चाही अशा होत्या की, आम्हीही त्याच कॉलेजला शिकलो आम्हीही छाती काढून चालायचो पण असा प्रकार कधी कोणी केला नसल्याचे ही चर्चिले जातेय.
अल्पवयीन पिढ्यांना सुसंस्कारांची फार मोठी गरज आहे. त्यांच्या व्यथा वेदना व प्रश्न समजून घेण्याची गरज आहे यासाठी व्यवस्था कमी पडते का? असंही वाटतं. एक मित्र म्हणून आपला सवंगडी आपलाच दुश्मन बनेल असं कधी त्याला वाटलं असेल का? छोट्या छोट्या चुकांवरती इतकं प्रक्षोभक आणि विभित्सपणे ही अल्पवयीन पिढी वागून नेमकं काय साध्य करू इच्छिते?
समाज मनाबरोबरच समाज हेही एक पुस्तक आहे आपण वास्तवाला धरून वागतो का, शिक्षण व्यवस्था नेमकी कुणीकडे चालली हा देखील एक प्रश्नच आहे. हीच घडलेली घटना आपल्या उंबऱ्यापर्यंत यायला जास्त कालावधी लागणार नाही. म्हणूनच आज प्रत्येक पालकांच्या मनात भीतीच वातावरण बारामतीत आपण बघतोय. शिक्षण व्यवस्थेबरोबरच त्याचे पालकही यासाठी तितकेच जबाबदार असावेत. अशा वाईट घटनांचा लवकरच बंदोबस्त होईल अशी आशा वाटते.











