किरण माने, अभिनेता
खूप वेदना झाल्या. मला कळायला लागल्यापासून तरी मी ही पहिली घटना पाहिली की, छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला आहे. तो ही थेट पंतप्रधानाच्या हस्ते अनावरण झालेला पुतळा ! पुतळा एवढा जुना ही नाही की, नेहरुंच्या किंवा इंदिराजींच्या काळातला होता… मोदीजीच्या हस्ते उद्घाटन झालेला पुतळा होता हा. दहा वर्षांपुर्वीचा नाही, अगदी परवा-परवा. इलेक्शनच्या चारपाच महिने आधी. राममंदिराच्या दिड महिना आधी. त्यानंतर फक्त २६६ दिवसांत ही नामुष्की आणणारी दुर्घटना घडते !
यांच्या हस्ते उद्घाटनं झालेल्या विमानतळांची छतं कोसळताना आपण पाहिली… पुल कोसळताना पाहिले… पुलांना भेगा पडलेल्या पाहिल्या… बोगदे पाण्यानं तुंबलेले पाहिले…रस्ते खचलेले पाहिले… राममंदिराचा गाभारा गळताना पाहिला… नवीन संसदेचा मार्ग पाण्याखाली गेलेला पाहिला… नवीन संसद इमारतीत गळती लागून बादल्या ठेवाव्या लागल्याचे लाजीरवाणे दृश्य पाहिले… जगापुढे शरमेने मान खाली जावी अशा या घटना. पण त्या सगळ्यावर या घटनेनं मात केली.
त्यांना टीकाकार ‘पनौती’ वगैरे म्हणतात ते मला अजिबात आवडत नाही. एक तर असं कुणाला म्हणणं चुकीचं आहे. पनौती ही अंधश्रद्धा आहे. एकदा दुर्दैवावर गोष्ट ढकलून दिली की आपण यामागचा कारणकार्यसंबंध शोधणं सोडून देतो. नेहरूंच्या काळापासून बांधलेले पुल, रस्ते, इमारती आणि पुतळे सत्तर-पंचाहत्तर वर्षे भक्कम उभे असतात… आणि आजकाल गाजावाजा करत, प्रचार करत हजारो करोड खर्चून, स्पेस टेक्नाॅलाॅजी वापरून बांधलेलं सगळं एका वर्षाच्या आत पत्त्याच्या बंगल्यागत कोसळतं, याचं कारण पनौती नसतं. मग काय?
‘भ्रष्टाचार, घोटाळे आणि निकृष्ट बांधकाम.’ बस्स.
दुसरं काहीही नाही. पनौती म्हणून हसण्यावारी नेण्यापेक्षा आपण तर्कशुद्ध विचार करूया. हा भ्रष्टाचार आता थेट छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीतही होऊ लागला, हे भयानक आहे ! स्वातंत्र्यानंतरच्या पाऊणशे वर्षांतल्या भ्रष्टाचाराच्या होत्या-नव्हत्या त्या सगळ्या मर्यादा आज ओलांडल्या गेल्या आहेत. कहर झाला आहे. धोक्याची घंटा आहे ही. भ्रष्टाचार्यांच्या विळख्यात संपूर्ण देश जखडला गेल्याचा हा सिग्नल आहे. अजून तरी होय जागा… तुका म्हणे पुढे दगा !











