बारामती : महान्यूज लाईव्ह
काही वर्षांपूर्वीची उत्तर प्रदेशातील घटना आहे, तेथील कोर्टामध्ये एक खटला सुरू होता. या खटल्याची सुनावणी न चुकता अशी सुरू व्हायची.. कोर्टातला पट्टेवाला ओरडायचा.. कैलासवासी जितेंद्रप्रसाद हाजीर हो!.. आणि खरोखरीचा जिवंत जितेंद्रप्रसाद कोर्टात काही वर्ष आपण जिवंत असल्याचे ओरडून ओरडून सांगायचा..! उत्तर प्रदेशचं काय घेऊन बसलात, आपल्या पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर, बारामतीत देखील काही वर्षांपूर्वी मयत व्यक्तींना जिवंत दाखवून त्यांच्या जमिनी हडपण्याची प्रकार उघडकीस आले होते..
आता असे प्रकार उघडकीस आल्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, गावातला तलाठी असेल, हे सगळे सरकारी लोक थोडे तरी जिवंतपणे एखादा दस्त करताना काहीतरी काळजी घेतील असे वाटले होते, पण पैशापुढे काही मात्रा चालत नाही.. आणि सातत्याने मेलेली माणसे याच पैशासाठी आणि जमिनीच्या तुकड्यासाठी पुन्हा जिवंत होऊन पृथ्वीतलावर येत राहतात. आताही बारामती तालुक्यात जायपत्रेवाडी परिसरात वर्षापूर्वी मृत झालेला एक चुलता त्याच्या भाऊ आणि पुतण्याच्या प्रेमापोटी एक वर्षानंतर बारामतीत त्यांना जमीन देण्यासाठी आला होता..!
पण झालंय काय की, या चुलत्याला पुन्हा जिवंत केल्याबद्दल बाप लेकालाच धडा मिळाला.. अर्थातच तो पुराण काळातील यमराजाने किंवा चंद्रगुप्ताने धडा दिलेला नसून तो बारामतीतील पोलिसांनी दिलेला आहे. कारण या बापलेकाने खरोखरच आत्मा बोलावला नसून, बनावट चुलता तिथे उभा करून जमीन नावावर करून घेतल्याचे उघडकीस आले, त्यावरून बारामतीत 7 ऑगस्ट 2024 रोजी सचिन सुनील जायपत्रे, सुनील चंदर जायपत्रे व चंदर सावळा जायपत्रे (तिघेही रा. जायपत्रेवाडी मु. पो. मुढाळे, वडगाव निंबाळकर तालुका बारामती) या तिघा विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 नुसार 318(4), 338, 336(3) व 3(5) या कलमाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी, श्रीरंग मारुती जायपत्रे यांनी या संदर्भात फिर्याद दिली. बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्यामध्ये श्रीरंग जायपत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरील तिघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. श्रीरंग जायपत्रे यांचे वडील मारुती तात्या जायपत्रे हे 27 जानेवारी 2011 रोजी मयत झाले. वडगाव निंबाळकर येथे 14 हेक्टर जमीन सावळा बापू जायपत्रे, भागुजी आबा जायपत्रे, ज्ञानोबा आनंदराव जायपत्रे यांनी सन 1958 मध्ये आगम यांच्याकडून खरेदी केली होती. ती सावळा जायपत्रे ज्ञानोबा जायपत्रे व भागोजी जायपत्रे यांना प्रत्येकी 11 एकर 30 गुंठे जमीन मिळालेली होती.
त्याप्रमाणे सावळा जायपत्रे व ज्ञानोबा जायपत्रे यांनी त्यांचे नावे लागलेल्या 11 एकर 30 गुंठे जमिनीचे 2011 सालीच वाटप केलेले होते, परंतु बाबूजी आबा जायपत्रे यांनी विकत घेतलेल्या 11 एकर 30 गुंठे जमिनीचे सन 1994 मध्ये नऊ हेक्टर 91 आर क्षेत्र सर्जेराव भागुजी जायपत्रे व मोतीराम भागुजी जायपत्रे यांच्या नावे वाटप करण्यात आले आणि पोट खराबातील एक हेक्टर 40 गुंठे क्षेत्र वाटपाचे राहून गेले होते. श्रीरंग जायपत्रे यांच्या आजोबा तात्या आबा जायपत्रे हे मयत झाल्यानंतर सदर जागेच्या वारसा मध्ये वारसा नोंदीसाठी सर्जेराव भागुजी जायपत्रे, मोतीराम भागुजी जायपत्रे, रंगनाथ तात्या जायपत्रे व मारुती तात्या जायपत्रे यांचा समावेश होता, परंतु सचिन जायपत्रे यांचा महा-ई-सेवा केंद्र व्यवसाय आहे. सचिन सुनील जायपत्रे हे भावकीतील आहेत. सचिनला मोतीराम बाबूजी जायपत्रे व सर्जेराव भागुजी जायपत्रे यांचे नावे कमी जागा लागल्याची समजले.
त्यामुळे त्याने मारुती तात्या जायपत्रे हे 27 जानेवारी 2011 रोजी मयत झालेले असताना ज्ञानदेव अंतू जायपत्रे हे 12 मे 2010 रोजी मयत झलेले असताना देखील सचिन सुनील जायपत्रे, सुनील चंदर जायपत्रे, चंदर सावळा जायपत्रे यांनी संगनमत करून चंदर सावळा जायपत्रे यांच्या नावे अर्ज केला व संबंधित क्षेत्र हडप करण्याच्या उद्देशाने तहसीलदारांकडे पोट खराब क्षेत्राचे वर्गीकरण करण्याबाबत 9 जून 2011 मध्ये अर्ज केला होता. त्या अर्जामध्ये श्रीरंग जायपत्रे यांचे वडील मारुती तात्या जायपत्रे हे मयत असताना व चुलते रंगनाथ तात्या जायपत्रे, मोतीराम बागुल जायपत्रे यांच्या खोट्या सह्या व भावकीतील मयत असलेल्या ज्ञानदेव आनंदराव उर्फ ज्ञानदेव अंतू जायपत्रे व सर्जेराव भागोजी जायपत्रे या दोघांचा खोटा अंगठा दिला.
मात्र त्यामुळे तहसील कार्यालयाने 29 ऑक्टोबर 2012 रोजी आदेश दिला व त्या आदेशामध्ये मंडळ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पीक पाणी व शिवार फेरी करून उचित कार्यवाही करण्याचा आदेश दिला होता. मात्र त्यामध्ये कोठेही हक्क अदा करण्यात आलेला नव्हता. मात्र तरीदेखील चंदर सावळा जायपत्रे यांनी स्वतःच्या नावे इतर हक्कात या जमीन लावून घेतली. 14 जुलै 2024 रोजी श्रीरंग जायपत्रे यांनी त्यांची गुरे बांधण्यासाठी या क्षेत्रात गोठा बांधण्याचे काम सुरू केल्यानंतर सचिन जायपत्रे सुनील जायपत्रे व चंदर जायपत्रे यांनी पुन्हा येथे आला, तर खल्लास करेन. ही जागा आमची आहे, पुन्हा नादी लागू नका, आमच्यासाठी कोर्ट कचेरी नवीन नाही, काय करायचे ते कर असे म्हणून हाकलून दिले.
त्यावरून श्रीरंग जायपत्रे यांनी तहसील कार्यालयात जाऊन सदर जागेची कागदपत्रांची खात्री केली व त्यांना हा प्रकार उघड झाल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सचिन जायपत्रे, सुनील जायपत्रे व चंदर जायपत्रे यांनी मोतीराम भागुजी जायपत्रे यांचे नाव कमी जागा लागल्याचे माहित असूनही संगनमत करून मारुती तात्या जायपत्रे हे मयत झाले असताना व ज्ञानदेव जायपत्रे हे मयत झालेले असताना देखील त्यांच्या खोट्या सह्या, अंगठे व भावकीतल्या मयत व्यक्तीच्या सह्या व खोटे अंगठे देऊन संबंधित क्षेत्र बळकावल्यावरून ही फिर्याद दाखल करण्यात आली.











