तब्बल चार तास ग्रामस्थांचा रास्ता रोको आंदोलन!
राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड ते पाटस अष्टविनायक राज्य मार्गावर दौंड तालुक्यातील बिरोबावाडी येथे शालेय विद्यार्थी रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या मालवाहतूक करणाऱ्या पिकअप जीप गाडीने एका विद्यार्थ्याला उडवल्याने भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.
आई समोरच मुलाचा दुर्देवी अंत झाल्याने आईचा टाहो फोडला आणि ती जागीच कोसळली. हृदय हेलवणारी ही थरारक घटना आज सकाळी घडली. दौंड तालुक्यातील बिरोबावाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या समोर शुक्रवारी (दि २८) सकाळी नऊ वाजण्याच्या आसपास ही घटना घडली.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ आणि या रस्त्यावर दोन्ही बाजूला गतिरोधक बसवण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी तब्बल साडेतीन, चार तास रास्ता रोको आंदोलन केले. माजी आमदार रमेश थोरात हेही या रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते. प्रशासनाच्या हालगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेला असून अष्टविनायक रस्ता प्रशासन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन या ठिकाणी त्वरित गतरोधक बसावेत अशी मागणी माजी आमदार थोरात यांनी यावेळी केली.
आयुष राजेश यादव (वय ८, सध्या राहणार बिरोबा वाडी तालुका दौंड, जिल्हा पुणे) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. बिरोबावाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरी या विद्यार्थ्याचा प्रवेश घेण्यासाठी मागील चार दिवसापूर्वी पालकांनी शाळेत येऊन शिक्षकांना विचारपूस केली होती. आणि शुक्रवारी शाळेचा पहिला दिवस असल्याने आयुष हा आई हिरादेवी त्याच्यासोबत शाळेत हाताला धरुन तो शाळेच्या दिशेने चालला होता.
मात्र वर्गात पाय ठेवण्याअगोदरच काळाने घाला घातला. रस्ता ओलांडत असताना पाटस बाजूकडून दौंड दिशेला भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहतूक पिकअप जीप गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात आयुषला डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आईच्या समोरच ही घटना घडल्याने आईने जागी टाहो फोडला, काही क्षणात तीही बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडली.
हृदय हेलावणाऱ्या या थरारक घटनेमुळे बिरोबावाडी परिसरात शोककळा पसरली. या घटनेचा निषेध म्हणून काही क्षणात ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात माजी आमदार रमेश थोरात हेही सहभागी झाले. सकाळी साडे नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत तब्बल साडेतीन – चार तास ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या मांडत आक्रमक पवित्रा घेतला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गतिरोधक करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.
घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, दौंड पोलीस निरीक्षक संतोष डोके तसेच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दौंड तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार तुषार बोरकर, मंडलाधिकारी सुनील गायकवाड, तलाठी संतोष येडुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांची चर्चा करून अष्टविनायक महामार्ग प्रशासनाची चर्चा करून या ठिकाणी संध्याकाळी चार वाजेपर्यंत प्लास्टिक गतिरोधक बसविण्यात येतील तसेच चार दिवसात त्या ठिकाणी डांबरीकरणाचा गतिरोधक केले जाईल असे आश्वासन दिले.
यावर मागील आठ वर्षापासून आम्ही सातत्याने सार्वजनिक बांधकाम विभाग, दौंड तहसीलदार आणि अष्टविनायक महामार्ग प्रशासन यांना गतिरोधक होण्यासाठी पत्रव्यहार करीत आहे. मात्र प्रशासन या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करीत आहे. सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहे. आतापर्यंत सहा जणांचा या ठिकाणी अपघात होऊन मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. चार दिवसात या ठिकाणी डांबरीकरणाचा गतिरोधक नाही झाल्यास पुन्हा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संतप्त ग्रामस्थांनी दिला.
सन 2008 च्या घटनेची पुनरावृत्ती!
२९ नोव्हेंबर २००८ ला याच ठिकाणी रस्ता ओलांडताना कोमल वायसे आणि राणी नाळे या दोन मुलींना भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने धडक दिली. यामध्ये कोमल बबन वायसे या पाचवर्षीय मुलीचा मृतदेह समारे सात किलोमीटर ओढत नेला होता. तिचा जागीच मृत्यू झाला होता, तर राणी राजेंद्र नाळे ही गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. आईच्या समोरच कोमल वायसे हीचा अपघात होऊन मृत्यू झाला होता. शुक्रवारी त्याच घटनेची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. आयुष याचा त्याच ठिकाणी आईच्या समोर अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.











