सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर शहरात जणू शाळा-कॉलेजच्या मुला-मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठीच सुरू केलेल्या तीन कॅफेवर इंदापूर पोलिसांनी काल छापा टाकला. कॅफेचा मालक व कॅफेत आढळलेल्या आठ जणांना इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रतितास शंभर रुपये चार्ज आकारुन अतिशय मंद लाईट मध्ये विद्यार्थ्यांना ही एकांतवासाची सुविधा दिली जात होती.
शालेय विद्यार्थी बिघडू नये व इंदापुरची शैक्षणिक संस्कृती चांगली राहावी म्हणून इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी केलेल्या कारवाईचे पालकांनी कौतुक केले, मात्र बारामतीतही काही महिन्यांपूर्वी अशीच कॅफेवर कारवाई झाली आणि नंतर ते कॅफे तसेच राहिले. आजही बारामतीत मंद प्रकाशातील कॅफे बिनधास्तपणे सुरू आहेत.
काल शुक्रवारी (दि.२१) पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयासमोरील पवार बिल्डिंग व बाजारतळ येथे कॅफे क्रन्च मध्ये कॅफे चालक यांनी कॅफेमध्ये मुला मुलींना बसण्यासाठी प्लायवुडचे कंपार्टमेंट करुन त्यास पडदे लावून अंधार केलेला आहे. त्या ठिकाणी मुला मुलीना बसण्यासाठी प्रती तास 100 रुपये भाडे घेतले जात आहे. अर्थात सुविधा उपलब्ध करून दिल्याच्या ठिकाणी मुला मुलींचे असभ्य वर्तन होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीवरून पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, हवालदार नितीन तांबे, लक्ष्मण साळवे, पोलीस नाईक सुनील कदम, मपोकाँ. सुरेखा निमगिरे, मपोकाँ. काजल शेळके व दोन पंच अशा पथक काल शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पवार बिल्डिंग समोर जाऊन पोहचले.
कॅफेमध्ये असलेल्या पाच जणांसह तिन्ही मालकांना ताब्यात घेऊन नोटीस देत पुढील कारवाई केली. तर कॅफेतील उपस्थित मुली व महिला पोलीस आल्याचे पाहून निघून गेल्या. अशी माहिती पोलिसांनी दिली. तीनही कॅफे चालकांनी कमी लाईटच्या प्रकाशात, लाकडी क्वार्टरसमध्ये दोन दोन खुर्च्या ठेवून त्यामध्ये मुलामुलींना बसवून गप्पा मारण्याची व प्रती तास 100 रुपये घेत घेऊन हा व्यवसाय निर्धास्तपणे सुरू केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान शालेय विद्यार्थ्यांचे भवितव्य बिघडू नये यासाठी पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे व त्यांच्या सहकारी पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सर्वसामान्य नागरिक तसेच पालक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र आपले पाल्य शालेय शिक्षणासाठी इंदापूर मध्ये येतात आणि त्यांची पावले जर चुकीच्या मार्गाकडे जात असतील, तर भविष्यात विद्यार्थ्यांचे होणा-या नुकसानीच्या भीतीपोटी पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.











