विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : शरद पवार तीन दिवस बारामती दौऱ्यावर होते. शरद पवार सुपे येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, विकास लवांडे, तालुकाध्यक्ष अॅड. एस. एन. जगताप,सतीश खोमणे, सदाशिव सातव, युगेंद्र पवार, वनिता बनकर, पोपट पानसरे, हनुमंत चांदगुडे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत तुम्ही फार उत्तम काम केलं. कोणी बोललं नाही, पण नेमकं कोणतं बटण दाबायचं याचा विचार तुम्ही केला. हे कर्तृत्व तुम्ही करून दाखवलं. तुम्ही तुमचं काम केलंय. चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेचं काम करा आणि बाकीच्या कामांचे ओझे माझ्या खांद्यावर टाका. ते कसे करायचे हे मी बघेल असे शरद पवार म्हणाले.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, मला काळजी फक्त एकाच गोष्टीची आहे. आता मी कारखेलला- देऊळगाव होतो, तिथल्या लोकांनी मागणी केली की, जनाई उपसा योजना ही पाईपलाईनने करावी. तसेच बऱ्याच लोकांची अशी पाईपलाईनने योजना न होण्याची मागणी आहे. अशा परस्परविरोधी मागण्या आहेत.
त्याठिकाणी माझे मत वेगळं आहे. माझे मत पाटाने पाणी देणं यात थोडं नुकसान होते. पण यातून आजूबाजूच्या विहीरींची पाणीपातळीही वाढते. त्यामुळे त्या विहीरीला अधिक पाणी लागण्याची शक्यता असते. त्याचा निकाल एकत्र बसून घ्यावा लागेल असे शरद पवार म्हणाले.
आपल्या भागात दुधाचा धंदा वाढवला. सुप्याला आणि या भागात ३० हजार लीर इतके दुधाचे कलेक्शन होते. हा धंदा मुद्दाम आपण वाढवला. त्या दुधाची खरेदी करून दुधावर प्रक्रिया करणारे तीन कारखाने बारामती येथे काढले. तुम्ही लोकांनी यात चांगले लक्ष घातले. त्यामुळे दुधाचा जोडधंदा हा प्रपंच चालवायला अतिशय उपयुक्त पडला. त्याची ही किंमत आहे, त्यात राज्य सरकारकडून कमीत कमी पाच रुपये वाढून द्यायची मागणी केली होती.
सरकारने निर्णय घेतला, पण अनेक ठिकाणी हे पैसे दिले नाहीत. आज सरकारकडे दुधाची रक्कम वाढवून द्यायची मागणी करावी लागेल. हे सगळं करण्यासाठी सरकार हाती असले पाहीजे. आम्ही ठरवलंय, चार महिन्यांनी निवडणूका आहेत. महाराष्ट्राचे सरकार हातात घ्यायचे. मग हा कांद्याचा, पाण्याचा, दुधाच्या भावाचा प्रश्न असो, तो कसा सुटत नाही हे बघू असेही शरद पवार म्हणाले.











