प्रा. रणजीत गोरे, सणसर
यावर्षी वाढलेले तापमानाने साऱ्यांना जाणीव करून दिली. आज मी फक्त एका तालुक्याचा आढावा घेतो. ज्या तालुक्याला तीनही बाजूने पाण्याने वेढलेले आहे, या तालुक्यात यावर्षीची तापमानाची स्थिती भयानक होती. त्याचा विचार करता राज्यातील इतरही सर्वच तालुक्यात नागरिकांनी एकत्र येऊन स्वतःहून स्वयंस्फूर्तीने वृक्षारोपणाच्या मोहिमेत सहभागी व्हावे. पाऊस सुरू झाला आहे, तेव्हा अंग झटकून कामाला लागण्याची गरज आहे. दिवसभर आपण आपल्यासाठी वेळ देतो एखादा तास पर्यावरणासाठी द्यावा. त्याची गरज आहे.
एकंदरीतच जागतिक स्तरावर वाढलेले तापमान आणि कायमच वाढत चाललेले पाण्याचे दुर्भिक्ष यामुळे इंदापूर सारखे बरेच तालुके आता दुष्काळग्रस्त म्हणून ओळखले जात आहेत. फक्त इंदापूर तालुक्याचाच विचार केला, तर संपूर्ण इंदापूर तालुक्याच्या जवळपास तीन बाजूंनी पाण्याचा अखंड स्त्रोत असतानाही, इंदापूर तालुक्यातील पाण्याची कमतरता दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे.
अर्थातच यामागे जलद गतीने होत असणारे नागरिकरण व औद्योगीकरण हे देखील महत्त्वाचे कारण आहे. यामुळे पुढील पिढ्यांना येथील समृद्ध नैसर्गिक वारसा मिळावा यासाठी या भागातील पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याची गरज आहे. या दृष्टीने केल्या जाणाऱ्या उपाययोजनांपैकी वृक्षारोपण अतिशय सहजसाध्य व लांबचा विचार करता अतिशय योग्य उपाययोजना आहे.
तालुक्याची भौगोलिक स्थिती: इंदापूर तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीत मुळा-मुठा, भीमा आणि नीरा या नद्यांचे अस्तित्व असूनही, पाणी व्यवस्थापनाच्या अभावामुळे येथे पाणीटंचाई जाणवते. याच्या उलट बारामती तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणामुळे तापमान तुलनेने कमी आहे आणि पर्जन्यमान वाढलेले आहे.
वृक्षारोपणाची गरज आणि फायदे: तापमान कमी करणे: झाडे उष्णतेचे शोषण करतात, ज्यामुळे स्थानिक तापमान नियंत्रणात राहते. पर्जन्यमान वाढवणे: झाडांमुळे आर्द्रता वाढते आणि त्यामुळे पावसाचे प्रमाण सुधारते. पर्यावरण संवर्धन: वृक्षांमुळे जैवविविधता वाढते आणि पर्यावरणातील संतुलन राखले जाते.
वृक्षारोपणासाठी योजनाबद्ध उपक्रम :
वृक्षारोपणासाठी इंदापूर तालुक्यातील विविध औद्योगिक संस्था, दूध डेअरीज आणि नामवंत शैक्षणिक संस्था यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. इंदापूरचे विद्या प्रतिष्ठान, आय कॉलेज – इंदापूर, कळंब, वालचंदनगर, भवानीनगर, भिगवण व बावडा – सराटी परिसरातील शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवून लोकांमध्ये जनजागृती करता येऊ शकते.
योजना आणि उपक्रम : औद्योगिक संस्थांचा सहभाग घेऊन तालुक्यातील मोठ्या उद्योगांनी वृक्षारोपणाच्या उपक्रमांसाठी निधी आणि साधनसामग्री पुरवावी. शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देऊन विद्यार्थ्यांना सक्रियपणे सहभागी करावे. स्थानिक स्वयंसेवी संघटनांचा सहभाग वाढावा. वृक्षारोपण मोहिमा आयोजित करून स्थानिक जनतेला प्रोत्साहन द्यावे. अर्थात यासाठी सरकारी पाठबळ आवश्यक आहे. तालुका प्रशासनाने वृक्षारोपणासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवून, झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन करण्यासाठी विविध योजना आखाव्यात.
आगामी पावसाळ्यात वृक्षारोपण मोहिमेचा वेग वाढवून लावलेल्या झाडांचे नीट संगोपन केल्यास पर्यावरण संवर्धनासाठी आणि पर्जन्यमान वाढवण्यासाठी नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येईल. इंदापूर तालुक्याच्या पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे.











