अॅड. गणेश आळंदीकर, सोमेश्वरनगर, बारामती
खरं तर राजीव गांधीची हत्या हा संपूर्ण भारताला बसलेला ऐतिहासिक धक्का होता. त्या दृष्टीने माझे दुःख खूपच छोटे आहे, मात्र ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळलो, ज्यांच्या स्वप्नपूर्ती करता मी झगडलो, त्या माझ्या वडिलांच्या दशक्रिया विधीला देखील मला येता आले नाही, ही सल आज ही 33 वर्षानंतर माझ्या मनात कायम राहिली.
त्यावेळी मी केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरी करत होतो. पुण्याच्या के.ई.एम. हॉस्पिटल मध्ये वडिलांवर उपचार चालू असतानाच मी पाषाण ग्राउंड वर भरतीसाठी परीक्षा दिली व उत्तीर्ण झालो. दवाखान्यातूनच वडिलांना दादा आत्ता मला नोकरी लागली आहे.आपल्या घरावरचे छप्पर लवकरच निघणार आहे तुम्ही काळजी करू नका असे आश्वासन देवुन मी माझ्या ट्रेनिंगला गुजरात जवळ गांधीनगर येथे रुजू झालो.
अवघ्या दोन महिन्याच्या ट्रेनिंग मध्ये आम्हाला इलेक्शन ड्युटीसाठी जुनागडला जावे लागले. तिथे पोहोचल्यानंतर मोठे बंधू किरण यांनी वडिलांच्या निधनाची पोस्टाद्वारे तार पाठवली. त्यानंतर तीन दिवसांनी मला विचारण्यात आले, तुम्हाला सुट्टीला जायचे आहे का? तुमचे वडील गेले आहेत. मी दहा दिवसाच्या सुट्टीसाठी विनंती केली असता, कशीबशी सहा दिवसांनी मला सुट्टी मिळाली.
अंत्यविधी, सावडणे वगैरे विधी तर हाती लागलेच नव्हते. मात्र दशक्रिया विधीला २२ मे ला गावी पोहोचण्याची खात्री होती. २१ मे १९९१ रोजी अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर दुपारी बारा वाजताच पोहोचलो. संध्याकाळच्या रेल्वेची वाट पहात असतानाच संध्याकाळी राजीव गांधी यांची तामिळनाडू येथे हत्या झाल्याच्या बातम्या पसरल्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे रोखल्या गेल्या.
तासातासाला रेल्वेचे वेळापत्रक बदलत होते. भारतात कुठेही काय झाले, तरी मुंबई मात्र संवेदनशील टप्प्यावर असते याची प्रचिती आली. मुंबई बंद झाली असल्याने तिथे रेल्वे गाड्या जाणार नाहीत, अशी घोषणा करण्यात आली आणि वडिलांचा दशक्रिया विधी आपल्याला सापडणार नाही याची खात्री झाली. 24 तास अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी गाड्या सुरू करण्यात आल्या आणि मी २३ मे ला मुंबईला पोहोचलो व वडीलांच्या निधनानंतर चक्क ११ व्या दिवशी घरी पोहोचलो .
अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर एकीकडे राजीव गांधी यांची हत्या कशी झाली ही माहिती घेण्याची उत्सुकता तर दुसरीकडे आपण वडिलांचे निधनानंतर दहाव्या दिवशी तरी घरी पोहोचू अशी आशा होती. या द्विधा मनस्थितीत अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर काढलेले ते 24 तास आजही जेव्हा 21 मे येतो, तेव्हा सर्व आठवणींचा पट एखाद्या चित्रपटासारखा डोळ्यासमोर येतो.
वीस वर्ष झोपडीत काढल्यानंतर मी केंद्रीय राखीव पोलीस दलात असताना आम्ही 1994 साली घर बांधले, पण त्याच्या वास्तुशांतीला देखील मला येता आले नाही. मात्र त्या दुःखापेक्षा वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या दशक्रिया विधीला देखील येता आले नाही हे दुःख कायम स्मरणात राहीले. सेनादलातील जवानांचा खूप मोठा त्याग असतो हे जवळून अनुभवता आले. आयुष्यात आलेल्या अनेक अविस्मरणीय आठवणी पैकी एक आठवण आज राजीव गांधी यांच्या हुतात्मा दिनानिमित्त जागृत झाली.
(लेखक बारामती तालुक्यातील प्रसिद्ध विधीज्ञ असून ज्येष्ठ पत्रकारही आहेत, तसेच ते सराफा बाजारातील तज्ञही आहेत. संपर्कासाठी – 9423020255)











