सचिन पवार, महान्यूज लाईव्ह
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उन्हाचा पारा 40, 41 अंशापर्यंत राहतो आहे आणि किमान तापमान वाढत चालले आहे. अंगाची लाहीलाही करणारी उष्णता साऱ्यांनाच असह्य करत असतानाच दररोज संध्याकाळी आभाळ भरून येते आणि ढगांचा आवाज होत राहतो. पाऊस काही पडत नाही, दिलासा काही मिळत नाही, पण जे काही होते त्यातून पाण्याची वाफ मात्र झाल्याशिवाय राहत नाही. आज तर बारामती तालुक्यातील काऱ्हाटीमध्ये वीज पडून गाय वासराचा बळी गेला आणि बळीराजाची लाखो रुपयांचे नुकसान झाले.
बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथील सुनंदा शिवाजी लोणकर यांच्या गोठ्यातील एका गाईचा आणि वासराचा वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला. गेल्या सात आठ दिवसापासून प्रचंड उष्णता सगळ्यांनाच हैराण करून सोडत आहे आणि संध्याकाळच्या वेळी ढग मात्र आवर्जून येऊन त्याचा दमटपणा रात्रीसुद्धा वाढवत आहेत. गरजणारे ढग काही बरसत नाहीत आणि चार दोन हलक्या सरींनी वातावरणात काहीच फरक पडत नाही.
अशी परिस्थिती असतानाच आज संध्याकाळी बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात विजांचा कडकडाट झाला आणि पावसाच्या दोन हलक्या सरी कोसळल्या, मात्र विजांमुळे दोघाजणांचा जीव मात्र गेला. तालुक्यातील काऱ्हाटी गावात झालेल्या या घटनेमुळे लोणकर यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे अगोदरच दुष्काळी परिस्थिती आणि त्यात पुन्हा लोणकर परिवारासाठी दुःखदायी ठरला आहे.











