ज्ञानेश्वर रायते, बारामती
यंदाची २०२४ ची लोकसभा निवडणूक अनेकार्थांनी लक्षात राहणार आहे. लोकशाहीच्या प्रक्रियेत आमदारांना पक्षांतरबंदी लागू असताना अख्खेच्या अख्खे पक्षच इकडून तिकडे हस्तांतरीत करण्याची लोकशाहीतील पहिली प्रक्रिया महाराष्ट्राने अनुभवली. राज्यातील दोन प्रमुख पक्षांची दोन शकले केल्यानंतर ते दोन पक्षातील एकमेकांसोबत असणारे नेते एकमेकांवर तोंडसुख घेताना राज्यातील मतदार पाहणार आहेत आणि हे ज्यांनी केले, ते भाजप मात्र आपल्या दुडक्या चालीनुसार आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत राहणार आहे.
विशेषतः गाजणारी निवडणूक ही बारामतीचीच असणार आहे. बारामतीवरील गेल्या ५ दशकांपासून अविरत असलेल्या आपल्या अनभिषिक्त राजकीय वर्चस्वाच्या अंताची सुरवात होणारी ही लढाई पवार कुटुंब या निवडणूकीत लढत आहे. पवार विरूध्द पवार ही अशक्यप्राय वाटणारी लढत भाजपच्या पुढाकारामुळे शक्य झाली. उमेदवारी जाहीर करण्यापर्यंत असे होणार नाही असे मानणाऱ्या बारामतीकरांची दोनही उमेदवारांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आणि चांगलीच कोंडी झाली. दोघांवरही निःस्सीम प्रेम असणाऱ्या मतदारांनी मग बोलणे बंद केले.
गेली अनेक वर्षे भाजप या मतदारसंघात पवारांचा पराभव करण्याच्या इर्षेने झटत होता. विशेषतः मोदी-शहांच्या जोडगोळीच्या आगमनानंतर तर ही ईर्षा अधिकच बळ धरून राहीली. सन २०१४ च्या मोदी लाटेत त्याला पाठबळ मिळाले, मात्र २०१९ मध्ये ते शक्य झाले नाही.
त्यामुळे इथे पवारांचा पराभव बाहेरून कोणी करू शकत नाही हे भाजपच्या धुरीणांच्या लक्षात आले. ए फॉर अमेठी आणि बी फॉर बारामती करण्यासाठी मग मोठी यंत्रणा कामाला लागली. त्यातच राष्ट्रवादीतही काही आलबेल नसल्याचे दिसून आल्याने व अजित पवारांची कोंडी होत असल्याचे पाहून पुढील राजकीय चक्रे फिरली आणि मोठे रामायण घडले.
मागील सहा ते सात महिन्यांत बरेच पाणी पुलाखालून गेल्यानंतर आता लोकसभेला भाजपला पाहिजे, त्या प्रमाणे सारे घडले आहे. आता बारामतीत पवार विरूध्द पवार ही लढत येथे घडणार आहे. बारामती हा पुरोगामी विचारसरणीचा बालेकिल्ला होता हे आता सांगावे लागेल, कारण आता तो ढासळू लागला आहे.
येणाऱ्या निवडणूकीचा निकाल कोणताही लागो, बारामतीच्या एकहाती राजकीय वर्चस्वाच्या अंताचीच ही लढाई ठरणार आहे. शरद पवार यांना धक्का बसला, तर पुरोगामी विचारसरणीला मोठा धक्का बसेल. महाराष्ट्रातील आजवरच्या अपराजित नेतृत्वाला पराभवाचा धक्का चाखावा लागला, तर सामान्य माणसं हीच ज्यांची आजवरची ताकद आणि उर्जा राहीली, त्यांना वयाच्या ८४ व्या वर्षी आपल्या राजकीय वर्चस्वाच्या उताराचे स्थित्यंतर स्वतःच्या डोळ्यांनी पाहावे लागेल.
अजित पवारांना धक्का बसला, तर लोकाभिमुख नेतृत्वाची पिछेहाट होईल. आज देशात अनेकजण दिवसाच्या २४ तासांपैकी १८-१८ तास काम करण्याचा दावा करतात, मात्र खऱ्या अर्थाने हे १८-१८ तास काम करण्याचे अखंड काम अजित पवारांनी केले आहे. धडाकेबाज कामाचा प्रदिर्घ कालखंड सोबत जोडलेल्या अजित पवारांच्या पुढील राजकीय वाटचालीलाही मोठा धक्का बसेल. कारण अजित पवारांनी आता नवी वाट धरली आहे, त्या वाटेला सुरवातीलाच लागलेले काटे त्यांच्यासाठी धक्कादायक ठरू शकतात.
अर्थात लोक विचारधारेला महत्व देतात आणि भाजपसारख्या राजकीय वर्चस्वासाठी कोणत्याही थराला जाऊन राजकारण करण्याच्या वृत्तीला मात देतात की, जुने पुराणे विचार धुडकावून विकास आणि सत्तेला महत्व देतात हे येणाऱ्या मतदानातून दिसेलच, मात्र काहीही झाले, तरी भाजपने त्यांचा डाव साधला आहे.
अजित पवारांना यश आले, तर नवा विचारप्रवाह येथे सुरू होईल आणि शरद पवारांनी आजवर जोपासलेल्या त्यांच्या विचाराची पिछेहाट होईल, तर शरद पवार जिंकले, तर पुरोगामी विचारांचा हा वारसा मलिक अंबरच्या इतिहासापासून आजही महाराष्ट्रात अबाधित आहे याचा प्रत्यय येईल आणि असुरक्षित व द्वेषमुलक राजकारणाला मोठी चपराक बसेल, मात्र अजित पवारांसारख्या धोरणी व विकसनशील नेतृत्वाच्या प्रगतीला मोठी खीळ बसेल.
पूर्वीच्या काळापासून ते आता कालपरवापर्यंत एकत्र असलेल्या पवारांची राजकीय पॉवर कमी करण्यासाठी शरद पवारांच्या खूप जमीनी आहेत, कोणताही उद्योग महाराष्ट्रात आणला की, शरद पवारांची मालकी त्यात असते, इथपासून ते चंद्रावरही त्यांची जमीन आहे इथपर्यंत अनेक बदनामींचे इमले गेल्या ५० वर्षात सातत्याने रचले गेले.
मात्र असे बदनामीचे डोंगर रचणाऱ्या विरोधकांना जो कधीच जुमानला नाही, त्याला वृध्दत्वाच्या काळात नामोहरम करण्याचा चंग जाणीवपूर्क बांधला गेला आहे. महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये हिंदूत्ववादी पक्ष मूळ धरत असताना आपल्या विचारांपासून कधीच दूर न गेलेल्या पवार कुटुंबाला आजवर महाराष्ट्राचा ग्रामीण भाग हाताच्या फोडाप्रमाणे जपत आला, तेच पवार कुटुंब आता राजकीय ग्रहणाच्या चक्रव्यूहात फसले आहे.
या कुटुंबाला नामोहरम करण्यासाठी शेवटचा जोरदार प्रयत्न भाजपकडून होतोय, तो मतदार पाहतच आहेत. मात्र कालानुरूप अनेक बदल होत असतात. राजकीय स्थित्यंतरे होत राहतात. अशावेळी लोकशाहीतील राजा म्हणवला जाणारा मतदार जुनाच विचार नसानसात असल्याचे दाखवणार की, नव्या नवलाईच्या स्वागताला, बदलणाऱ्या काळाला कालाय तस्मै नमः म्हणणार हे निकालातूनच दिसेल. एक मात्र खरे की, कोणतेही पवार जिंकले तरी खरा विजय मात्र भाजपचाच होईल..!