राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई आहे. सध्या तालुक्यातील यवत, खोर, पडवी, जिरेगाव, वासुंदे या पाच गावांना पिण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या गावांना टॅंकरने पाणी पुरवठा करून पिण्यासाठी प्रशासनाकडून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
उन्हाळ्यातील मार्च महिना संपला, सध्या एप्रिल महिनांचा तिसरा आठवडा सुरू आहे. परंतु फेब्रुवारी महिन्यापासूनच दौंड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याची पाण्याची टंचाई निर्माण झाली. दुष्काळी भागातील गाव तलाव, बंधारे, विहिरीमधील पाणीपुरवठा संपुष्टात आल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. यंदा तर तालुक्यातील जिरायत भागांसह बागायत पट्ट्यातही पिण्याच्या पाण्याबरोबर शेतपिकांच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. परिणामी नदीकाठालगतच्या गावांनाही पाणी टांचाईचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील गार – बेटवाडी गावातील महिलांनी पाण्यासाठी आंदोलन करूनही अद्यापपर्यंत पाणी उपलब्ध झाले नाही. तालुक्यातील यवत, खोर, पडवी जिरेगाव, वासुंदे या गावांचे टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव आल्याने या गावांना व परिसरातील वाड्यावास्त्यांना मागील काही दिवसांपासून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
दरम्यान, तालुक्यात ज्या ग्रामपंचायती टँकरनं पाणी पुरवठा करण्यासंदर्भात प्रस्ताव देतील, त्या गावांना तातडीने पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर उपलब्ध करण्याची व्यवस्था केली जाईल अशी माहिती दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी दिली.