राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी राज्यातील १६० मराठा आमदारांना आगामी विधानसभेत पाडणार असल्याची घोषणा पुन्हा एकदा केली. आणि त्याची सुरुवात करताना दौंडचे सत्ताधारी आमदार राहुल कुल हे हिटलिस्टवर आहेत. आमचं ठरलंय, दौंड चा आमदार पाडायचाय असे म्हणत शेंडगे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचा जणू काय रणसिंगच फुंकले.
त्यांच्या या घोषणेने भाजप आमदार राहुल कुल यांचे मात्र टेन्शन वाढणार आहे. जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाला आरक्षण मिळवे आणि तेही सरसकट मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातूनच मिळावे या भूमिकेमुळे त्यांनी नेते ओबीसी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करीत त्यांना निवडणुकीत पाडण्याचा इशारा दिला होता. त्यावर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी तुम्ही एक भुजबळ पडाल तर आम्ही राज्यातील १६० मराठा आमदार पाडू असा इशारा दिला होता.
बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार महेश भागवत यांच्या प्रचाराच्या शुभारंभ कार्यक्रम मेळाव्यात त्यांनी पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती केली. प्रकाश शेंडगे यावेळी बोलताना म्हणाले की, इंदापूर येथे पार पडलेल्या ओबीसी मेळाव्यात मी दौंड चा आमदार पाडणार असे जाहीर केले होते. शेंडगे यांनी स्वर्गीय काकासाहेब थोरात यांचे चिरंजीव अनंत थोरात यांच्याकडे बोट दाखवत, आता आमचं ठरलंय, दौंड चा आमदार पाडायचा आहे. असे म्हणत जणू काय आनंद थोरात यांच्या आगामी विधानसभेच्या उमेदवाराची घोषणा करत आमदार कुल यांना एक सूचक इशारा या निमित्ताने दिला.
दौंड तालुक्यातील राजकारण हे नेहमीच आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात यांच्या भोवतीच खेळत आहे. तिसरा पर्याय उभा करण्याचा तत्कालीन मनसेचे नेते राजाभाऊ तांबे यांनी विधानसभा निवडणुकीत पंचवीस हजारांचं मतदान घेऊन प्रयत्न केला. तसाच प्रयत्न माजी आमदार रमेश थोरात यांचे सहकारी असलेले विकास ताकवणे यांनीही केला, मात्र त्यांना अपेक्षित यश प्राप्त झाले नाही.
सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आणि रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना दौंड मधून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात २५ हजारांच्या मतांची आघाडी मिळाली आणि तालुक्यात ओबीसी मतांची संख्या लक्षणीय असल्याची जाणीव झाली. ओबीसी मराठा आरक्षणाच्या निमित्ताने दौंड मतदार संघात ओबीसी विशेषता ओबीसी मधील मोठ्या लोकसंख्येचा घटक असलेला माळी – धनगर समाज एकवटत आहे.
दौंड तालुक्यातील अनेक गावागावात त्यांनी घोंगडी बैठका घेत ओबीसी समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याच प्रयत्नातून ओबीसी बहुजन पार्टीने माळी समाजाचा ओबीसी चेहरा महेश भागवत यांना बारामती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देत सत्ताधारी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे केले आहे. एकेकाळी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना मानणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले महेश भागवत आणि आनंद थोरात हे दोन ओबीसी नेते हे आमदार राहुल कुल यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.
आमदार कुल यांच्यामुळे भागवत आणि थोरात यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महेश भागवत आणि आनंद थोरात या दोन ओबीसी शिलेदारांमुळे आमदार कुल हे विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त करु शकले. आमदार कुल यांच्या गळ्यात विधानसभा निवडणुकीत विजयाची माळा घालण्यात भागवत आणि थोरात यांचा मोठा वाटा आहे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि आरक्षणाच्या निमित्ताने एकत्र आलेले ओबीसी चेहरे आता आगामी विधानसभेचे पारडे फिरवू शकतात, याचा अंदाज आता येऊ लागला आहे. त्यामुळे दौंड तालुक्याला तिसरा सक्षम पर्याय निर्माण होऊ शकतो अशी खात्री आता वाटू लागली आहे. ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी या निमित्ताने धनगर समाजाचा उमेदवार आगामी विधानसभेत देणार असल्याची एक प्रकारे घोषणा केली.
आगामी विधानसभेसाठी अनंत थोरात यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित मानली जात आहे. आणि तसं झालं तर आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे हे मात्र निश्चित. दरम्यान, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी यापूर्वी दौंडमधून महेश भागवत आणि अनंत थोरात यांना विधानसभेसाठी उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली होती.
तसाच प्रयत्न वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही या दोघांना विधानसभेचे ऑफर दिली होती. मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी घेऊन उभे राहण्याचे धाडस केले नाही. त्यामुळे जानकर यांनी आमदार राहुल कुल यांना रासपची उमेदवारी देऊन विधानसभेत पाठवले, मात्र सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार कुल यांनी रासपची उमेदवारी डावलुन भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली.
आमदार कुल यांनी पाठीत खंजीर खुपसला असा आरोप जानकारांनी त्यावेळी कुल यांच्यावर केला होता. मात्र आता राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम यांनी उत्तरप्रदेश मध्ये सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्मुला वापरला आणि तो यशस्वी केला. हाच सोशल इंजिनीरिंग चा फार्मूला सध्या प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश शेंडगे हे वापरत आहेत.
साहजिकच जे महादेव जानकर यांना दौंडमध्ये जमलं नाही, ते आता प्रकाश शेंडगे करून दाखवणार का? ते या रणनीतीत कितपत यशस्वी होतात? आणि आमदार कुल आणि माजी आमदार थोरात हे आपल्याकडील ओबीसी मतांचा गठ्ठा आपल्याकडे ठेवण्यात कितपत यशस्वी ठरतात? सत्ताधाऱ्यांच्या राजकीय दबाव तंत्राला आनंद थोरात आणि महेश भागवत बळी पडतात का? हे आता पहावे लागणार आहे.











